लातूर जिल्ह्यांतील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:29+5:302021-09-25T04:19:29+5:30
जिल्ह्यातील हरंगुळ ७८.८, मुरुड ७९.८, तांदुळजा ६६.०, भादा ६५.३ आणि निलंगा या महसूल मंडळात ६८.८ मिमी पाऊस होऊन ...

लातूर जिल्ह्यांतील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यातील हरंगुळ ७८.८, मुरुड ७९.८, तांदुळजा ६६.०, भादा ६५.३ आणि निलंगा या महसूल मंडळात ६८.८ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साठवण तलाव भरले आहेत. नदीनाल्यांना पाणी असून मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय मांजरा धरण ते साई नागझरी पर्यंतचे सर्व बॅरेजेस ओरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प असून त्यापैकी रेणा, व्हटी, साकोळ,घरणी, मसलगा, तिरू, देवर्जन हे सात मध्यम प्रकल्प भरले आहेत. तावरजा मध्यम प्रकल्प मात्र अद्याप भरलेला नाही. रेणा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडून दुसऱ्यांदा विसर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस....
जिल्ह्यात आतापर्यंत ८०५.४ मिमी पाऊस झाला आहे. जो की वार्षिक सरासरी पेक्षा अधिक आहे. वार्षिक सरासरी ७८९.५५ मिमी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८०५.३ मिमी. पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात आतापर्यंत ७९६, औसा ७४०, अहमदपूर ९३५, निलंगा ६८२, उदगीर ८८८, चाकूर ८२२ रेणापूर, ८९२, देवणी ७४४, शिरूर आनंतपाळ ७२९ आणि जळकोट तालुक्यात ९२७ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासांतील पाऊस...
गेल्या चोवीस तासांमध्ये लातूर जिल्ह्यात २५.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात लातूर तालुक्यात ५०.६०, औसा ३०.४, अहमदपूर २५.७, निलंगा ४०.५, उदगीर १.९, चाकूर २०.९ रेणापूर १०.५, देवणी १७.९६, आणि जळकोट तालुक्यात १.५ मिमी पाऊस झाला आहे. कोण जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 25.4 मिमी पाऊस झाला असून त्यात तांदुळजा,मुरुड, हरंगुळ, भादा आणि निलंगा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
अधून-मधून पावसाच्या सरी सुरूच....
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरूच असून शुक्रवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. गुरुवारी रात्री लातूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेत शिवारामध्ये पाणी झाले आहे. शिवाय, सोयाबीन काढणीला आले, परंतु शेतात पाणी असल्याने ते काढता येत नाही, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अतिपावसामुळे खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी विविध पक्ष संघटनांकडून होत आहे.