बलिदान अन् त्यागाच्या परंपरेमुळे उदगीरचे नाव अजरामर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:53+5:302021-09-17T04:24:53+5:30
उदगीर : मराठी साम्राज्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र, हैदराबाद ...

बलिदान अन् त्यागाच्या परंपरेमुळे उदगीरचे नाव अजरामर
उदगीर : मराठी साम्राज्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चळवळीतील असंख्य लढवय्या त्यागमूर्तींची जीवने आदर्शप्रत इतिहासाने नोंदविली. त्यानंतरही भाई श्यामलालजी, भाई बन्सीलालजी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यापासून ते सामाजिक आयुष्य वेचणाऱ्या डॉ. ना. य. डोळे यांच्यापर्यंत पावन परंपरेचे तीर्थक्षेत्र येथील मातीत विस्तारत गेले. याच बलिवेदीच्या पायावर आधुनिक कळस कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी धाराशिवकर यांच्या कारगिल युद्धातील बलिदानाने रचला. त्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले.
उदगीरमध्ये पंडित श्यामलालजी व पंडित बन्सीलालजी यांनी खेड्यापाड्यात आर्य समाज मंदिरे, आर्यदल, व्यायामशाळा स्थापन करून रझाकरांच्या अन्यायाविरोधात समाजमनात चीड निर्माण केली. त्यांना माधवराव घोणसीकर, संग्रामप्पा वकील, पंडित. कर्मवीरजी, प्रल्हाद भजनिक, अमृतराव मास्तर, दत्तात्रय पारसेवार, मोतीलालजी, आदी मंडळींचे सक्रिय योगदान लाभले. उदगीर, तिरुका, घोणसी, कौळखेड, तोंडचीर या भागांतील अनेक जणांनी हौतात्म्य पत्करले.
मराठवाडा मुक्ती संग्रामात रझाकार अन् निजामाविरुद्ध दोन हात करणाऱ्या किसान दलातील तरुणांची हत्तीबेट व रामघाटाचा डोंगर ही दोन तीर्थक्षेत्रे होती. मने पेटून उठलेल्या हुतात्मा किसनगीर गिरी, अप्पाराव पाटील कौळखेडकर, माणिकराव मुळे डोणगावकर, गंगाधरराव साकोळकर पाटील, गंगाराम रोडगे, निवृत्ती खटके, चनवीर देवर्षे, दिगंबर मुळे, दत्तूगीर तोंडचिरकर, नरसिंग लोहार, पंढरी सोनार, विठ्ठलराव पाटील, नरसिंग वस्ताद चाकूरकर, प्रभू बिरादार, यशवंतराव सायगांवकर, निवृत्ती गायकवाड यांच्यासह हजारो तरुणांनी ७ मे १९४८ रोजी किसान दलाची स्थापना केली. निजामाने २ ऑगस्ट १९४८ रोजी तोंडचिरवर हल्ला केला. या हल्ल्यात किसनगीर गिरी धारातीर्थी पडले. नंतर दहा दिवसांनी दुसरा हल्लाही रजाकारांनी तोंडचिरवर केला. कोणतीही साधनसामग्री, सत्ता नसताना या मावळ्यांनी निजामी व रजाकारी शक्तीला तोंड दिले. या लढाईत अट्टरग्याच्या टोळीने रामघाट डोंगरावर पराक्रमाची शर्थ केली. महंमद फजलचा अमानुष अत्याचार थांबविण्यासाठी किसान दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केली. रझाकारांनी अप्पाराव पाटील कौळखेडकर यांच्या अतिभव्य वाड्याची होळी केली. १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाचे सहा ट्रक लष्कर हत्तीबेटाभोवताली दाखल झाले. बेटाला वेढा देऊन त्यावर चढाई करतानाच किसान दलाच्या जवानांनी गोळीबार सुरू केला. त्यात निजामाचे ६० शिपाई ठार झाले. हत्तीबेटाचा सुगावा निजामाला लागल्याने पुन्हा हल्ला होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन किसान दलाने हत्तीबेटावर तिरंगा फडकावून वंदे मातरम्, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत आपला मुक्काम रामघाटच्या डोंगरात हलविला. सरदार पटेलांच्या भूमिकेमुळे निजामाचे राज्य लयास आले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रांत भारतीय संघ राज्यात विलीन झाला. भारतीय स्वातंत्र्याचा लढा व हैदराबाद मुक्तीचा लढा यांच्यातील साधर्म्य सारखेच आहे.