शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:40+5:302021-09-11T04:21:40+5:30
लातूर : काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक ...

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !
लातूर : काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक घडविणाऱ्या महाविद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ४० कॉलेजमध्ये १५०० जागांसाठी केवळ ९०० अर्ज आले आहेत. त्यामुळे डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा सीईटी देणे अनिवार्य असते. दरम्यान, सीईटी देऊनही नोकरीसाठी वेटिंगच करावी लागत असल्याने डीएडला प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाली आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने काही डीएड कॉलेज बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
नोकरीची हमी नाही...
डीएड केल्यानंतर नोकरीसाठी पैशांची मागणी होती. अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.
भरती बंद असल्याने अनेक जणांना शाळेवर कंत्राटी तत्त्वावर काम करावे लागते. अल्प मानधन मिळते.
सद्य:स्थितीत भरती नाही, नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.
म्हणून इतर अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश...
मोठ्या भावाने चार वर्षांपूर्वी डीएड केले. त्याला अद्यापही नोकरी मिळालेली नाही. आठ वर्षांपासून शिक्षक भरतीही झालेली नाही. नोकरीची हमी नसल्याने भावासारखी माझी स्थिती होऊ नये म्हणून, डीएडला प्रवेश न घेता बीएससीला प्रवेश घेतला आहे. - तुकाराम गंपले
गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. शासनाकडून तारीख पे तारीख सुरू आहे. त्यातच कित्येक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा जास्त असल्याने डीएडऐवजी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. इंजिनिअर झाल्यावर कोणत्याही कंपनीत नोकरी लागू शकते. - सूरज गिरी
प्राचार्य म्हणतात...
२०१४-१५ या वर्षामध्ये सीईटी झाली होती. त्याद्वारे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली. सद्य:स्थितीत शिक्षकभरती बंद आहे. नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थी प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नियमित शिक्षकांची पदे भरावेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा डीएडकडे कल वाढेल. - प्रवीण मोहिते
उदासीन धोरणांमुळे अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. टीईटीचेसुद्धा वेळेवर नियोजन नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे.
बारावीचा निकाल लागताच डीएडची प्रवेशप्रक्रिया सुरू होते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत अर्ज भरण्याची तारीखही संपते. परिणामी, इच्छा असूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. - गणपत माने