पाॅलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ? ३४०० जागांसाठी २४०० विद्यार्थ्यांचे अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:53+5:302021-09-18T04:21:53+5:30
लातूर : मागील काही वर्षांपासून पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षी या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या प्रमाणात ...

पाॅलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ? ३४०० जागांसाठी २४०० विद्यार्थ्यांचे अर्ज !
लातूर : मागील काही वर्षांपासून पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षी या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या प्रमाणात काहीअंशी वाढ झाली असून, ३ हजार ४०० जागांसाठी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
लातूर जिल्ह्यात १३ तंत्रनिकेतन असून, यामध्ये २ शासकीय तर ११ खासगी आहेत. शासकीयमध्ये ८२० विद्यार्थी क्षमता असून, खासगी महाविद्यालयात २ हजार ५८० क्षमता आहे. यंदाच्या वर्षांत संगणक, सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्टॉनिक्स अन्ड कम्युनिकेशन, ऑटोमोबाइल या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मागील काही वर्षांत पॉलिटेक्निककडे प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी, काही खासगी महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र, आता पुन्हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.
एकूण पॉॅलिटेक्निक महाविद्यालये - १३
एकूण प्रवेश क्षमता - ३४००
एकूण प्रवेश अर्ज - २४००
पॉलिटेक्निक महाविद्यालये -
शासकीय - ०२
खाजगी -११
महाविद्यालयात प्रवेश क्षमता -
शासकीय - ८२०
खासगी - २५८०
संगणक, इलेक्ट्रीककडे विद्यार्थ्यांचा ओढा...
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा संगणक आणि इलेक्ट्रीकल या दोन शाखांकडे सर्वाधिक आहे. रोजगाराची शाश्वती असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. या दोन शाखांना विद्यार्थ्यांची पसंती आहे.
म्हणून पॉलिटेक्निकला पसंती...
लहानपणापासूनच अभियंता होण्याची इच्छा होती. दहावीला चांगले गुणही मिळाले आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार आहे. अर्जही भरला असून, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे. आवडीची संगणक शाखा मिळेल अशी अपेक्षा आहे. गुणवत्ता यादीनंतरच चित्र स्पष्ट होईल. - मानसी महामुनी, विद्यार्थिनी
अनेकांचा ओढा विज्ञान, वाणिज्य, कला शाखेकडे असतो. मात्र, पहिल्यापासून इंजिनिअर होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्राॅनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेसाठी अर्ज दाखल केला आहे. दहावीच्या गुणांमुळे आवडीचे कॉलेज मिळेल. इंजिनिअर होऊन बाहेर देशात नोकरी करण्याचे स्वप्न असल्याने पॉलिटेक्निक करीत आहे. - बालाजी जाधव, विद्यार्थी
प्राचार्य म्हणतात...
विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निकडे प्रतिसाद वाढत चालला आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमी असते. त्यातच महाविद्यालयात कॅम्पस येत असल्याने विद्यार्थी तंत्रनिकेतनकडे आकर्षित होत आहे. नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळत असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.
-डॉ. अजय आगरकर
पॉलिटेक्निकच्या या वर्षांच्या प्रवेशासाठी शासनाच्या वतीने नियमावली दिली आहे. त्यानुसार ज्यांचे अर्ज कन्फर्म झाले नव्हते त्यांना संपर्क करून अर्ज भरण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून, रोजगाराची हमी असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढले आहे. - व्ही.डी.नितनवरे