सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात होणार घट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:44+5:302021-09-17T04:24:44+5:30
जळकोट तालुक्यातील सोयाबीनवर सद्य:स्थितीत करप्या, मावा, खोड अळी, शेंडी अळी, हळद्या, आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव ...

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात होणार घट !
जळकोट तालुक्यातील सोयाबीनवर सद्य:स्थितीत करप्या, मावा, खोड अळी, शेंडी अळी, हळद्या, आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्के घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तालुक्यात एकूण २५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून, त्यापैकी ८ ते १० हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी आपले नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा केला आहे. मात्र, सारखा पाऊस व त्या पाठपोठ विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिके पूर्णतः धोक्यात आले आहेत. त्याचबरोबर मुगाचे पीक व उडिदाचे पिके १०० टक्के हातातून गेले आहे. नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे होण्याच्या आधीच या रोगाने घाला घातल्याने बळिराजा अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे, वीज बिलाची वसुली थांबवावी, बँकेची वसुली थांबवावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे, मोफत शिक्षण करण्यात यावे, अशी मागणी या तालुक्यातील ४७ गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
रबी हंगामाकडे शेतकऱ्यांच्या आशा...
जळकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पावसामुळे तालुक्यातील लघू, मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे. खरिपाचे पीक हातचे गेले असून, रबी हंगामात तरी चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.