जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:56+5:302021-05-12T04:19:56+5:30
शेती मशागतीचे दर वाढल्याने गैरसोय लातूर : इंधनाचे दर वाढल्याने यंत्रावरील शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. शेतीसाठी खर्च ...

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्के
शेती मशागतीचे दर वाढल्याने गैरसोय
लातूर : इंधनाचे दर वाढल्याने यंत्रावरील शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. शेतीसाठी खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. नांगरणी १७००, रोटा १२००, मोगडा १३००, सरी सोडणे ११००, पंजी ११०० असा दर आकारला जात आहे. दरम्यान, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
प्रबुद्धनगरमध्ये सुविधा पुरविण्याची मागणी
लातूर : शहरानजीक असलेल्या प्रबुद्ध नगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी नियमित पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. आतापर्यंत प्रशासनाला अकराहून अधिक निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्याची दखल घेतली नसल्याची ओरड स्थानिक नागरिकांमधून होत आहे. या भागात रस्ते, नाली, पथदिवे आदी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर आर. आय. शेख, साजिद शेख, साबेर शेख, समीर शेख, अंगद गायकवाड, रमेश सूर्यवंशी, वाजीद शेख, रशिद शेख, रेहान शेख, बशीर शेख आदींची नावे आहेत.
एनएसयूआयच्या वतीने विलगीकरण केंद्र
लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एनएसयूआयच्या वतीने विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, नगरसेविका रागिनी यादव यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दत्ता सोमवंशी, आयुब मनियार, दिनेश नवगिरे, प्रवीण सूर्यवंशी, सचिन गंगावणे, गोविंद केंद्रे, बाळासाहेब करमुडे, पवन बनसोडे, बालाजी भोसले, राधिका खरोसे, शेखसरे, छाया माने, मनीषा कदम, आदमाने, निलोफर पठाण, आरती भुंबे, विद्या सूर्यवंशी, धनश्री गोकर्णा, पवन गिरी, नेताजी पिटले, गुणाजी पिटले आदींसह एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बार्शीरोडवरील पथदिवे बंद; नागरिकांची गैरसोय
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतनपर्यंत असलेले पथदिवे रात्रीच्या वेळी बंद राहत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्तीसाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन बंद असलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याआनुषंगाने औसारोड, पाच नंबर चौक, रेणापूर नाका आदी भागांत पोलीस प्रशासनाच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांकडील ई-पास तपासले जात आहेत. दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होत आहे.
मनपाच्या वतीने दंडात्मक कारवाई
लातूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र गंजगोलाई परिसरात काही अत्यावश्यक सेवेत न येणारी दुकाने उघडी असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान, मनपाच्या पथकाने या दुकानावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी गंजगोलाई परिसरात पाहणी केली. नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.