कूलर खरेदीला नागरिकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:43+5:302021-04-15T04:18:43+5:30
विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रमाची अंमलबजावणी लातूर : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा, यासाठी स्वाध्याय उपक्रमाची ...
विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रमाची अंमलबजावणी
लातूर : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा, यासाठी स्वाध्याय उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील ४४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३२ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासक्रम दिला जात असून, पूर्ण करून घेतला जात आहे. विषयनिहाय परीक्षा घेण्याचे नियोजनही स्वाध्याय उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.
रस्त्याची दुरवस्था; वाहनधारक त्रस्त
लातूर : शहरातून कळंबकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहे. रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.
बस स्थानक परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, तसेच अंबेजोगाई रोडवरील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. बस स्थानकातील शौचालयाची नियमित स्वछता केली जात नसल्याची प्रवाशांची ओरड आहे. या स्थानकातून औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांना बसेस जातात, त्यामुळे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. एसटी महामंडळ प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
खरीप हंगाम मशागतीला प्रारंभ
लातूर : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. कृषी विभागाच्या वतीने पेरणी क्षेत्राचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार, ग्रामीण भागात कृषी सहायकांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होत असतो. त्यानुसार, बियाणे, खतांचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने केले जात असून, तालुकानिहाय आढावा घेतला जात असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरातील फळबाजरात आवक वाढली
लातूर : उन्हाळ्यात रसाळ फळांना ग्राहकांची पसंती असून, शहरातील फळबाजारात आंबे, द्राक्ष, टरबूज, खरबूज आदी रसाळ फळांची आवक वाढली आहे. ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातून फळांची आवक होत आहे. त्यामुळे दर स्थिर असून, आगामी काळात रसाळ फळांना मागणी वाढणार असल्याचे लातूर शहरातील फळविक्रेत्यांनी सांगितले. यंदा उन्हाचा पारा वाढत असल्याने, रसाळ फळांच्या खरेदीला ग्राहकांची पसंती असल्याचे चित्र आहे.
आधार फाउंडेशनच्या वतीने जनजागृती
लातूर : तालुक्यातील धनेगाव येथील आधार फाउंडेशनच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. गावोगावी जनजागृतीचा संदेश देणारे भित्तीपत्रके लावण्यात येत असून, नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी लक्षणे दिसताच चाचणी करावी. विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आधार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.