मांजरा धरण शंभर टक्के भरले; पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:29+5:302021-09-22T04:23:29+5:30
२०१६ मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतरच्या पावसाळ्यात मांजरा धरण शंभर टक्के भरले. २०१६ पासून सतत ...

मांजरा धरण शंभर टक्के भरले; पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून विसर्ग
२०१६ मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतरच्या पावसाळ्यात मांजरा धरण शंभर टक्के भरले. २०१६ पासून सतत प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा झाला. परिणामी, शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. यंदाही धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. मांजरा नदीवरील लासरा ते साई, नागझरी पर्यंतचे सर्व बंधारे भरले आहेत. मांजरा नदी वाहती आहे. १६५ किमी अंतरापर्यंत पाणी आहे. नदीपात्रात मुबलक पाणी आणि मांजरा धरण भरल्यामुळे उजनीच्या पाण्याची चर्चा आता थांबली आहे. मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. या क्षमतेत धरण भरल्याने उजव्या कालव्यातून विसर्ग करण्यात आला असल्याचे धरणावरील शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी सांगितले.
लातूर शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा....
२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाई नंतर लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीपुरवठा झाला असला तरी आठ दिवसआडच पाणी पुरवठा शहराला होतो आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसाआड किंवा सहा दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न मनपाने केला, परंतु तो यशस्वी ठरला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही लातूरकरांना आठ दिवसाचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. यामुळेच जिल्ह्यात डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
उजनीच्या पाण्याची चर्चा थांबली.....
लातूर शहरालगतच्या बंधारे आणि मांजरा प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे आठ दिवसांच्या ऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहेत. परंतु वितरण व्यवस्था मनपाने मजबूत केली नाही. शिवाय, आता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे उजनीच्या पाण्याची चर्चाही थांबली आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या अनुषंगाने उजनीच्या पाण्याची चर्चा केली जाते. मात्र नागरीक या चर्चेत पडत नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.