लातूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर मोड येथून लातूरकडे येताना वेगवान कार दुभाजकाला धडकून चौपदरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोनशे फूट फरफटत, पलटी होत खड्ड्यात गेली. सोमवारी सायंकाळी ४:२० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारच्या समोरचा भाग चक्काचूर झाला. मात्र, सीटबेल्ट लावल्याने कारमधील तिघे बचावले आहेत. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत, तर दोघे किरकोळ जखमी आहेत.
तुळजापूर मोडहून औसा ते लातूरदरम्यान कार वेगाने निघाली होती. चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरून चौपदरी रस्त्यातील विरुद्ध बाजूचा रस्ता ओलांडून फरफटत खड्ड्यात गेली. यामध्ये कारमधील प्रसाद साळुंके यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर औसा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला हलविल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. सी. थडकर यांनी सांगितले. इतर दोघे किरकोळ जखमी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
जखमींची प्रकृती धोक्याबाहेर...गंभीर जखमी झालेले प्रसाद साळुंके यांच्या डोक्याला बाहेरून मोठी दुखापत आहे. परंतु, आतल्या बाजूने रक्तस्राव नाही. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे न्यूरो सर्जन डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले. सीटबेल्ट लावल्यामुळे अपघातातील जखमींना मोठी दुखापत नसल्याचेही ते म्हणाले.
हेल्मेट, सीटबेल्ट असेल, तर गंभीर दुखापत टळतीलदुचाकीवरील अपघातात हेल्मेट असणारे वाहन चालक बचावतात. तर कारमध्ये सीटबेल्ट लावणारे प्रवासी सुरक्षित राहतात, असे अनेक अपघातांच्या प्रसंगामध्ये दिसून आले आहे. सोमवारचा अपघात भयंकर होता. कारच्या समोरच्या भागाचा चुरा झाला. दोनशे फूट पलटी खात कार खड्ड्यात कोसळली. केवळ सीटबेल्टमुळे गंभीर दुखापत टळली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.