वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऊस भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:49+5:302021-09-08T04:25:49+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील वर्षात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, ३ हजार ५०० हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर उसाची लागवड ...

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऊस भुईसपाट
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील वर्षात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, ३ हजार ५०० हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. घरणी, साकोळ, पांढरवाडीसारखे तलाव, तसेच डोंगरगाव, हालकीसारखे बंधारे असल्याने उसाची चांगली जोपासना झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस २० ते २५ कांड्यापर्यंत वाढला आहे. अवघ्या महिनाभरात अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास जाण्यायोग्य तयार झाला असतानाच मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा मंगळवारी सकाळपासून जोर वाढला. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुटल्याने तालुक्यातील हालकी येथील राधाकिशन इगंळे यांचा १ हेक्टर, तर हरी सारंगे, मनोहर मोरे यांच्याही उसाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय दैठणा, साकोळ, सांगवी घुग्गी, अंकुलगाराणी, बाकली, बिबराळ, उजेड, डोंगरगाव, तळेगाव, शेंद, तिपराळ, कानेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्याही उसाचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राधाकिशन इगंळे, सारंगे, मोरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.