लातूर : राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहात असून, या सरकारला मराठा समाजाचेही आरक्षण टिकवता आले नाही. हे सरकार जनतेचे नसून वसुलीचे सरकार आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेत्वृत्वाखाली ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश आले. सरकारच्या नाकर्तेपणातुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हे आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण ओबीसी समाजाला तत्काळ मिळावे, यासाठी बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, युवा नेते अरविंद पाटील-निलंगेकर, स्वाती जाधव, माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे, संगीता घुले, बापू राठोड, टेंबक घुटे, अशोक केंद्रे, दशरथ सरवदे, रेखाताई तरडे, ज्ञानेश्वर चेवले, बन्सी भिसे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर भाजप नेत्यांची भाषणेही झाली. आमदार रमेश कराड, गणेश हाके, गोविंद केंद्रे, बापू राठोड यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारने तत्काळ ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा ओबीसी समाजाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष...
न्यायालयाच्या आदेशाकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील हक्काच्या राजकीय आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हे आरक्षण संपुष्टात आले असून, यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजासाठी जागा आरक्षित राहणार नाहीत. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.