उदगिरातील सर्व तलाव तुडुंब, पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:33+5:302021-09-24T04:23:33+5:30
उदगीर : तीन दिवसांपासून तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसामुळे तालुक्यातील ...

उदगिरातील सर्व तलाव तुडुंब, पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
उदगीर : तीन दिवसांपासून तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसामुळे तालुक्यातील सर्व लहान-मोठे तलाव शंभर टक्के भरले आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मागील वर्षीप्रमाणे जर परतीच्या पावसाने तालुक्याला तडाखा दिला तर हाता-तोंडाशी आलेल्या सोयाबीनला फटका बसण्याची भीती आहे.
तालुक्यात यंदा मृगात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. जुलैत पडलेल्या २५ दिवसांच्या खंडानंतर ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या सोयाबीनच्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राशी सुरू झाल्या आहेत. सोयाबीनचे पीक उत्तम आल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बाजारात दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राशी होण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनचे पीक हातात येत असतानाच तीन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे तालुक्यातील सर्व लहान-मोठे पाझर व साठवण तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न तूर्त संपुष्टात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा बनशेळकी, देवर्जन व भोपणी हे तिन्ही तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न मिटलेला आहे. परंतु रबीच्या पेरणीला असलेला वेळ व खरिपाच्या सुरू झालेल्या राशी पाहता हा पाऊस शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणारा आहे. तालुक्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची कापणी सुरु असताना झालेल्या जोरदार पावसामुळे ते डागी होते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
तालुक्याच्या खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा सोयाबीनवर आहेत. हवामान खात्याने पुढील तीन-चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अगोदरच मजुरांनी दर वाढविल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाने अधिकच चिंताग्रस्त केले आहे. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८८० मिमी असून सप्टेंबरमध्ये सरासरी ओलांडली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत तालुक्यात ९०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत सरासरी ९०० मिमी पाऊस...
तालुक्यातील क्षेत्रपाळ, सुकणी, नळगीर, होनी हिप्परगा, जकनाळ, बामाजीचीवाडी, गुडसूर, हाऊळ, केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरधाळ, निडेबन, एकुर्का, कोदळी, चांदेगाव येथील तलाव व शहराला पाणीपुरवठा करणारा भोपणी, देवर्जन व बनशेळकी तलाव शंभर टक्के भरले आहेत. कल्लूर ९५ टक्के, तर करखेली तलावात ६६ टक्के जलसाठा झाला आहे. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ८८० मिमी असून गुरुवार सकाळपर्यंत तालुक्यात ९०० मिमी इतका पाऊस झाला आहे, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.
मंडळनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून, कंसातील आकडे आजपर्यंतच्या पावसाचे : उदगीर ५५ (१००४), नागलगाव २५ (८१८), मोघा १८ (९४१), हेर ४८ (८४०), वाढवणा १४ (९२२), नळगीर १० (९६८), देवर्जन २५ (८४३), तोंडार ४३ (८६७).