जळकोट तालुक्यातील मंगरुळ, सोनवळा, येवरी या भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, सातत्याने वीज गुल होत आहे. नियमिपणे वीजबिल भरणा करणा-या ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, येथील काही जणांनी महावितरणकडे तक्रारीही केल्या होत्या. परंतु, कुठलीही कार्यवाही करण्यात येत नव्हती. गुरुवारी महावितरणच्या विशेष पथकांनी सोनवळा, मंगरुळ येथे धाडी टाकून वीज चोरी करणाऱ्या ९ जणांवर कार्यवाही केली आहे.
कोळनूरअंतर्गतच्या सोनवळा फिडरवर अतिरिक्त भार वाढून वीजपुरवठा खंडित होत होता. त्यासाठी त्या फिडरवरील वीजचोरी रोखण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. यात घरगुती वापरासाठी ९ जण वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. या पथकात शिरुर ताजबंद उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शिवशंकर सावळे, सहाय्यक अभियंता भोसले, मोगरकर, बेरुळे, सोळुंके आदी होते. ही मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.