कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:38+5:302021-09-24T04:23:38+5:30

लातूर : ग्रामीण भागातील काही माध्यमिक शाळा सुरु असून, शहरात मात्र, शाळा बंदच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी ...

86% schools closed in district despite corona outbreak | कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच !

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच !

लातूर : ग्रामीण भागातील काही माध्यमिक शाळा सुरु असून, शहरात मात्र, शाळा बंदच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ०.८० टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांप्रमाणे शहरातील शाळा सुरु करण्याची मागणी होत असून, कोरोना ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण कधी मिळणार असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण २ हजार ५७० शाळा आहेत. यामध्ये माध्यमिकच्या ७७८ शाळांचा समावेश असून, यापैकी १०५ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग घेतले जात आहेत. तर शहरातील शाळा बंदच आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये आठवी नंतरचे वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला आहे. तरीही शहरातील शाळांमध्ये अजूनही ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. शहरातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत राज्य शासनाच्या आदेश आणि शिक्षण विभागाच्या सूचना नसल्याने शाळा प्रशासनाला आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग सुरु करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले...

गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षणात मुलांना एकाच खोलीत मोबाईल समोर दिवसभर बसून रहावे लागते. शहरी भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून, त्यांना ऑफलाईनची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, अनेक मुलांना सततच्या मोबाईलच्या वापरामुळे डोळेदुखी, चिडचिडेपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आतापर्यंत १०५ शाळांची वाजली घंटा...

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात माध्यमिकच्या १०५ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये १० हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत वर्ग सुरु आहेत. याच नियमानुसार शहरातील शाळा सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत असल्याचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांनी सांगितले.

ग्रामीण भागामध्ये विद्यार्थांचा प्रतिसाद...

ग्रामीण भागातील काही शाळा नियमित सुरु आहे. वर्गामध्ये ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण समाधानकारक आहे. काेविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु आहे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक संघ

शहरातील शाळा सुरु करण्याची गरज...

गेल्या दीड वर्षांपासून शहरातील शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागात ज्या पद्धतीने कोविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु आहेत. त्याच धर्तीवर शहरातील शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी. शासनाच्या कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

- श्रीनिवास जाधव, मुख्याध्यापक

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या...

पहिली - ४२१५७

दुसरी - ४६०२८

तिसरी - ४६८४७

चौथी - ४७०००

पाचवी - ४७८६०

सहावी - ४८९४५

सातवी - ४८३८३

आठवी - ४७४५४

नववी - ४८४६८

दहावी - ४७३१८

अकरावी ५ ३६५८९

बारावी - ३२८९९

Web Title: 86% schools closed in district despite corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.