जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा यंदा ३४८.८३४ दलघमी पाणीसाठा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:09+5:302021-09-14T04:24:09+5:30
लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प ...

जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा यंदा ३४८.८३४ दलघमी पाणीसाठा अधिक
लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प आहेत. मांजर आणि तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यातील मांजरा ९० टक्के भरला आहे. या प्रकल्पावर शहराचा पाणीपुरवठा आणि सिंचन क्षेत्र मोठे आहे. हा प्रकल्प भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणा, तिरू, देवर्जन, साकोळ हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. घरणी आणि व्हट्टी हे दोन्ही प्रकल्प भरत आले आहेत. मसलगा प्रकल्पात ६० टक्क्यांच्यावर पाणी आले आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये, ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणी ५११.७११ दलघमी आहे. जवळपास ७३.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून सिंचनाचाही जवळपास प्रश्न सुटलेला आहे.
अशी आहे उपलब्ध पाण्याची टक्केवारी.....
मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, लघु प्रकल्पांमध्ये ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
१४२ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर १९ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. १५ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून, २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. तर ८ प्रकल्प अत्यल्प पाणी साठ्यात आहेत.
तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस...
जिल्ह्यात आतापर्यंत ७२४८ मि. मी. पाऊस झाला असून गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत फक्त ५४६ मी.मी. पाऊस झाला होता. यंदा दोनशे मि. मी. पाऊस अधिक झाला आहे. लातूर ७१४.१, औसा ६७७.८, अहमदपूर ८२६, निलंगा ६१४.४, उदगीर ७९८.८, चाकूर ७३२.५, रेणापूर ८०६.९, देवणी ६५३.५, शिरूर अनंतपाळ ७७५.२, जळकोट तालुक्यात ८५३.२ मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. खरिपाची पेरणी यामुळे यंदा वेळेत होणार आहे. सोयाबीनला सध्या मिळत असलेला भाव असाच पुढील एक ते दोन महिने राहिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यासाठी सोयाबीनचा दर असाच स्थिर राहणे आवश्यक आहे.