कृषी पंपांची ५८०० कोटींची थकबाकी; वसूलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर !
By संदीप शिंदे | Updated: November 19, 2022 19:30 IST2022-11-19T19:29:34+5:302022-11-19T19:30:08+5:30
लातूर परिमंडल : ११ हजार ६६६ कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत

कृषी पंपांची ५८०० कोटींची थकबाकी; वसूलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर !
लातूर : महावितरणच्यालातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ४९२ शेतकऱ्यांकडे ५ हजार ८७९ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण वसूलीसाठी ॲक्शन मोडवर आला असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.यंदा समाधानकारक पाऊस झालेला असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रबी हंगामासाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असून, वीजेची खरेदी, रोहित्रांची दुरुस्ती, ऑईल खरेदीसह आवश्यक दुरुस्तींसाठी थकीत विजबिलाची वसूली होणे आवश्यक आहे. १६ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ३३० कृषिपंपधारकांकडे २२८८ कोटी ८८ लाख, लातूर १ लाख ३१ हजार ६७२ पंपधारकांकडे १७८३ कोटी ७४ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ४९० कृषी ग्राहकांकडे १ हजार ८०६ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे.
तीनपैकी एक बिल भरणे आवश्यक...
महावितरणच्या वतीने कृषीपंपांना वर्षातून तीन बिले दिली जातात. यामध्ये एकही बिल न भरल्याने थकबाकी वाढली आहे. त्यामुळे महावितरणतर्फे थकीत बिलाच्या वसूलीसाठी मोहीम राबविली जात आहे. ज्या कृशि पंपधारकांकडे थकबाकी आहे. त्यांनी भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे.
- सुंदर लटपटे, मुख्य अभियंता
जिल्हा ग्राहक संख्या थकबाकी (कोटीत)
बीड १७९३३० २२.८८.८८
लातूर १३१६७२ १७८३.७४
उस्मानाबाद १५३४९० १८०६.७५
एकूण ४६४४९२ ५८७९.३७