झक्काझक्की - भाग ७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:30+5:302021-09-24T04:27:30+5:30

“माय लाॅर्ड श्री. केवल, माझे अशील आहेत. त्यांचं म्हणणं आहे, मुलाचं, सुकांतचं पालकत्व त्यांच्याकडे कायमचं असावं.” कणिकाचे वकील म्हणाले, ...

Zhakkazkki - Part 7 | झक्काझक्की - भाग ७

झक्काझक्की - भाग ७

“माय लाॅर्ड श्री. केवल, माझे अशील आहेत. त्यांचं म्हणणं आहे, मुलाचं, सुकांतचं पालकत्व त्यांच्याकडे कायमचं असावं.”

कणिकाचे वकील म्हणाले, “आईचा आपल्या मुलांवर जास्त अधिकार असतो. सुकांतचे पालकत्व त्यांच्याकडे रहावं. अशी विनंती अर्जात केली आहे. कोर्टाने अर्ज वाचावा व निकाल जाहीर करावा, अशी मी विनंती करतो.”

“कणिका मॅडम तुमचं म्हणणं तुमचे वकील बोलले तेच खरं मत आहे का?”

“होय, सर.”

“पण, तुमचे पती यांनी त्यांच्याकडे, सुकांतचा कायम ताबा मिळावा असा अर्ज केला आहे? तुम्हाला हे ठाऊक आहे?”

“होय, सर. मला माहिती आहे.”

“पण मॅडम, संसार दोघांचा असतो. मुलंही त्याचा अविभाज्य भाग असतात. तुम्ही सासरचं घर सोडून माहेरी कायमचे जाण्याचे पाऊल का उचलले. तुमच्या पतीने कधी मारहाण केली का? घर सोड असं सांगितलं का?

“ते चुकीचा धागा पकडून माझ्याशी भांडण करायचे. माझा मुलगा व सासूबाई खूप दु:खी झाले होते. पत्नी म्हणून मला कधीच किंमत मिळाली नाही, किती दिवस सहन करणार? म्हणून मी मुले व सासूबाईंनाही घेऊन बाहेर पडले. माझा सुकांतवर मातृत्वाचा हक्क आहे. त्याला मी पतीकडे देणार नाही.”

आता कोर्टातही दोघेही भांडू लागले. दोघांनाही सुकांतचा ताबा हवा होता. कणिकाच्या आई-वडिलांच्या जबान्या झाल्या. त्यांनी कणिकाचं दुसरं लग्न करून देणार आहोत. ती घरात असल्याने माझ्या मुलाला मुली पसंत करत नाहीत. आमच्या इस्टेटीमधला वाटा म्हणून तिला फ्लॅटही घेऊन दिलाय.

“सुकांत मला पाहिजे.” केवल.

“मुळीच नाही, मी आई आहे त्याची तो मलाच पाहिजे.”

या आशयावर दोघेही झक्काझक्की करू लागले. शेवटी अवंतिकाबाईंना त्यांचं म्हणणं सांगावं असं न्यायाधीशांनी आदेश दिले. “साहेब मुलाची आई जरी माझी सून कणिका असली, तरी मुलगा, माझा नातू सुकांत त्याच्या बापाचंच नाव, आडनाव लावतो आणि लावतच राहणार.”

“ओपिनियन नोटेड सर” वकील बोलले.

“आत्ताच कणिकाचे आई-वडील दुसरं लग्न करून देणार म्हणून सागंत होतं. चालेल मला. तिने एकटीने राहू नये. असं मलाही वाटतं. पण माझा मुलगा आणि तिचं कधीच पटलं नाही. अशा मरण खाईत ह्यांचा संसार कसा होणार, ह्या विचाराने आम्हीच घराबाहेर पडलो. शारीरिक त्रासाला बरं करता येतं; पण मनावरचे घाव, भळाळणाऱ्या जखमा कशाने बुजतील?”

“बरं ठीक आहे. पण सुकांतचा ताबा कुणाकडे असावा असं तुम्हाला वाटतं. ते स्पष्ट, कोणाचंही दडपण मनावर न घेता सांगा आजी.” न्यायाधीशांनी फर्मावलं.

“खरं सांगू? हे दोघं एकत्र न झालेलंच बरं. हे दोघेही कधी एकमेकांना किंमत देत नाहीत, की मान राखत नाहीत. केवल सुकांतचा ताबा मागतोय तर कणिकाही तेच म्हणते आहे. त्यांच्यासाठी मुलाचे दोन तुकडे तर करता येणार नाहीत. झाडांची फांदी तुटकी की पुन्हा झाडाला जोडता येते का? नाही. इथे तोच प्रकार आहे. जे मागे घडलं तेच पुन्हा सुरू. ह्यांचा हा वाद निर्णयापलीकडचा आहे. तेव्हा दोघांनीही स्वतंत्र राहावं. मी माझ्या नातवाला, सुकांतला तो सज्ञान होईपर्यंत नक्कीच सांभाळीन. तो सज्ञान झाला की तो स्वत: कोणाकडे राहायचं ते ठरवेल. माझा मोठा मुलगा मालगुंडला असतो. त्याच्या मदतीने मी चांगली त्याला शिकवीन, वाढवीन. अद्याप मला एकही गोळी नाही. मी चांगली ठणठणीत आहे, तेव्हा माझ्या ताब्यात सुकांतला द्यावं, अशी मी आपल्याला विनंती करते. केवलला विचारा, त्याचं मत? त्याने होकार दिला. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

“पाॅइंट नोटेड”. न्यायाधीश म्हणाले.

“आजी, तुम्ही त्याला सज्ञान होईपर्यंत तुमच्या घरी नेऊन सांभाळणार आहात, असं प्रतिज्ञापत्र उद्या कोर्टाला द्या. तुम्ही खरोखर धडाडीच्या आणि खंबीर मनाच्या आहात.” जज्ज बोलले.

कोर्टातून बाहेर पडताच कणिका आई-वडिलांवर चिडली.

“एवढी मी तुम्हाला सांभाळणं जड होत असेल तर आत्ता त्या फ्लॅटच्या चाव्या द्या. मी घरी येतच नाही जा.”

तर अवंतिकाबाईंना चिडून बोलली,

“हा असला उद्योग तुम्ही कराल, असं वाटलं नव्हतं मला. शेवटी तुम्ही माझ्यापासून सुकांतला विलग करतायतच.”

“तुझा लग्नाचा मार्ग मोकळा होईल. तू दुसऱ्या नवऱ्याशी निर्धोक राहू शकतील. सुकांतची जबाबदारी कोण घेणार सांग? आणि केवलपण त्याला हवं ते करील. तुम्ही दोघेही सुकांतसाठी पैसे पाठवत जा. तुला केवलकडून मुलासाठी पोटगी मिळू शकेल. तू अर्ज दे तसा. मोठ्या दिराला, विद्याधर आणि वनिताला तरी कुठे मूलबाळ आहे? त्यांची पण मनं घराला वारसदार मिळाला म्हणून समाधानी होतील.”

दुसऱ्या दिवशी अवंतिकाबाईंनी ॲफिडेव्हिट कोर्टाला सादर केलं. न्यायाधीशांनी ते वाचून ते उभे राहिले आणि त्यांना सन्मानाने नमस्कार केला.

न्यायाधीशांनी अवंतिकाबाईंची विनंती मान्य केल्याचा व कणिका आणि केवलच्या विभक्ततेला मान्यता व सुकांतला आजीकडे सोपविण्यालाही स्वीकृती करून तसा निकाल दिला. टाळ्यांचा कटकडाट केला. अवंतिकाबाई व कणिकाच्याही अश्रूधारा लागल्या. गर्दीतून वाट काढत केवल आईजवळ आला. आईचे पाय धरू लागला. अवंतिकाबाईंनी त्याच्या तोंडावर लाथ मारली.

“माझ्या पाया पडू नकोस. चालता हो. मी सुकांतला सांभाळायला समर्थ आहे.”

दुसऱ्याच दिवशी अवंतिका आजी, सुकांतला घेऊन गावी जायला निघाल्या.

“सूनबाई, सुकांत तुझाच आहे. तुझाच राहील. पण त्याची परवड तरी होणार नाही म्हणून मी हा तोडगा काढला. येत जा अधूनमधून आपल्या घरी. घर तुझंच आहे गऽ”

त्याची रिक्षा नजरेआड होईपर्यंत कणिका हात हलवत भरल्या डोळ्यांनी सुकांतला निरोप देत होती. सर्वच प्रश्न सुटले होते.

- राजेंद्र वैद्य

ज्येष्ठ कथालेखक, कवी, गीतकार

Web Title: Zhakkazkki - Part 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.