झक्काझक्की - भाग ६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:28+5:302021-09-24T04:27:28+5:30

कणिकाने घर सोडल्यानंतर लगेचच केवलशी घटस्फोट घेण्याचा अर्ज दिला होता. त्यात तिनेही सुकांतची जन्मदाती आई म्हणून त्याला तीच सांभाळेल. ...

Zhakkazkki - Part 6 | झक्काझक्की - भाग ६

झक्काझक्की - भाग ६

कणिकाने घर सोडल्यानंतर लगेचच केवलशी घटस्फोट घेण्याचा अर्ज दिला होता. त्यात तिनेही सुकांतची जन्मदाती आई म्हणून त्याला तीच सांभाळेल. त्याचा संपूर्ण ताबा तिच्याकडे राहावा हे नमूद केले होते. त्यावरून शहाला-प्रतिशह देण्यासाठी केवलने हा अर्ज दाखल केला होता.

आजच्या स्फोटक परिस्थितीने ती बुचकळ्यात पडली; पण जिद्द कायम होती. सुकांतला सर्व काही देऊन त्याला शिकवून मोठं करणे, त्याचे लग्न करणे हे सारं तिच्या मनात होतं. पण केवलच्या संघर्षनिर्मित मागणीने तीही गडबडली. तिनेही वकील बाईकडून केस लढायचं ठरवलं होतं. तिने फोन करून अवंतिकाबाईंचा सल्ला घेतला. त्याही तिच्याच बाजूने बोलल्या. त्याला सावत्र बाप नकोय, मग तो काय बिन लग्नाचा राहणार आहे का? मग सख्खी आई जिवंत असताना त्याने सुकांतने सावत्र आईजवळ का राहावे, तू असं लिही, तुझ्या निवेदनात. नाणं एक असतं. पणत्याला दोन बाजू असतात. बाजू उलटपलट केली तरी नाण्याची किंमत कमी थोडीच होते? जन्मदात्रीची सर कोणालाच येणार नाही. अगदी मलासुद्धा.”

केवल आणि कणिका तसे प्रेमाच्या बंधनात होते; पण केवलच्या वागणुकीला, भांडखोर स्वभावामुळे आपण बाहेर पडलो. एरव्ही केवल आपल्याशी किती प्रेमाने वागायचा.

“घराबाहेर पडलो ही चूकच झाली का?”

‘‘आपल्यामुळे दोन्ही घरांना बट्टा लागला. हे वाईट झालं!”

“आता अभिनयचं, धाकट्या भावाचं लग्न माझ्यामुळे होणार नाही, हा विचार मी घराबाहेर पडताना करायला हवा होता.”

दोघेही आपापल्या वकिलांची मते आजमावत होते. परस्परांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचे दोघांच्यात ठरले; पण कणिका घर सोडून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर. कणिकाला केवलचा खूप राग येत होता आणि दगडावर डोकं आपटल्यावर काय होणार? त्यापेक्षा त्याच्यापासून विभक्ती पत्करणं बरं. जरा शांत झालेला तिचा राग. केवलने मुलाचा ताबा त्याला मिळण्याचा कोर्टाला अर्ज दिला, तेव्हा पुन्हा उसळला. म्हणजे मी कमावती, स्वयंसिद्धा आहे. त्यामुळे मी त्याला नकोय. पण सुकांत मात्र हवा आहे. तो वंशाचा दिवा ना! त्याच्या लेखी माझ्या मातृत्वाला शून्य किंमत आहे. मात्र त्याचे पितृत्व तेवढ खरे आहे. आता हा झगडा, रस्सीखेच, झक्काझक्की सुरूच राहणार. प्रश्न गंभीर आहे; पण हा तिढा सोडवावा तर लागणारच आहे.

वकिलांनी तिला सल्ला दिला. तुम्ही न्यायालयात मुलाच्या ताब्याचा प्रश्न नेलात, भांडत राहिलात तर वेळ आणि पैसा दोन्हीही अफाट खर्च होतील. शिवाय न्यायालयाने त्यांना अभ्यासाअंती दिलेला निर्णय किंवा पर्याय दिला तर तो तुम्हाला आवडेल असं नाही. पण तो निर्णय स्वीकारणे मात्र दोघांना बंधनकारक ठरेल. मुलाचे शैक्षणिक, बौद्धिक व मानसिक वाढीचे वय झगडण्यातच संपून जाईल. वास्तविक तुम्ही हा प्रश्न कोर्टात नेला हेच चुकलंय तुमचं. मुलगा म्हणजे मातीचं खेळणं नाही. खाली पडलं, फुटून गेलं. तुकडे फेकून दिले झालं. त्याच्या बालमनाचा विचार केलात का कधी? तुम्ही दोघंही जवळ असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. तो मनातलं दु:ख व्यक्त करू शकत नसला तरी मानसिकता खालावलीय त्याची. सुकांतच्या निकोप वाढीसाठी, बालपणाचा आनंद भोगण्यासाठी पालक या नात्याने तुम्हाला स्वत:लाच एकत्र येऊन योग्य तो रस्ता मिळेल.

“तुम्हा दोघांनाही सुकांतचा ताबा तुमच्याकडे असावा हा नवा वाद निर्माण झालाय. त्याचा तुमच्यावरील विश्वास नष्ट झालाय. तुम्हा दोघांपैकी एकाने जरी पुन्हा दुसरा विवाह केला तर तो होणाऱ्या सावत्र बापाला किंवा आईला, तुमच्याविषयी असलेले प्रेम, आदर हे तो त्यांना सांगू शकणार नाही. त्यांना तो ‘आपले’ म्हणून मानणार नाही. परदेशात एकत्रित पालकत्व मान्य ठरले आहे आणि त्यात पालकांच्या हक्कांपेक्षा, अधिकारापेक्षा मुलांच्या हक्कांना जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे तिथली मुलं-मुली नव्या पालकांशी जुळवून घेऊ शकतात. तर अशा एकत्र पालकत्वास समसमान जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात. त्यात मुले मोठी झाली की, त्यांचे विचार, शारीरिक बदल, त्यांचं वागणं, बोलणंही बदलत जातं. त्याप्रमाणे त्या मुलांना स्वतंत्रता, वैयक्तिक व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी उत्तेजन दिले जाते. एकत्रित पालकत्व हे केवळ निजअपत्यासाठी लागते. मुले-मुली अशा नवख्या पालकासाठी नाहीत हे लक्षात घेतात. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही एकत्र बसून चर्चा करून पुन्हा सुकांतला माया, प्रेमाने, सुखी, निरागस, विकसित जीवन जगायला देऊ शकता. ती तुमचीच कर्तव्ये आहेत. तो म्हणतोय मम्मी आपल्या घरी चल. म्हणजे थोडक्यात, तुम्ही एकत्रपणे त्याला पाहिजेत. पण हे सारं परदेशात रूजतंय आणि आपल्या परंपरावादी, पुरुषप्रधान संस्कृतीत असं पालकत्व कोणीही स्वीकारायला राजी नसतं. बघा मॅडम, उद्या तुम्ही, सासूबाई, तुमचे आई-वडील, सुकांत आणि विरोधी म्हणून केवलला हजर राहायचंय. तुमच्या मुलांच्या जबानीला अत्यंत महत्त्व आहे. त्यानुसार न्यायाधीश न्यायदान करतील. आज विचार करा. एवढं सगळं पुराण वकिलांनी सांगितलं ते घटस्फोट घेण्याचा तिला हवा तो निर्णय कालच मिळाला होता. पण तो पुन्हा रद्दही करता येतो.

Web Title: Zhakkazkki - Part 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.