झक्काझक्की - भाग ५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:26+5:302021-09-24T04:27:26+5:30
“आई, मला क्षमा कर. मी नाही भांडणार कणिकाशी. एक संधी दे.” “तुला हजार संधी दिल्या पण तू नर्मदेतला दगड ...

झक्काझक्की - भाग ५
“आई, मला क्षमा कर. मी नाही भांडणार कणिकाशी. एक संधी दे.”
“तुला हजार संधी दिल्या पण तू नर्मदेतला दगड निघालास. त्याला माझं दुर्दैव म्हणावं लागेल. चल गं कणिका, बाळाचं, तुझं आवर. मी माझी चार लुगडी घेतलीत. आताच घर सोडू. पुरे झाला हा तमाशा. एक दिवस काही सुखाने घास खाता येत नाही. सुकांतही त्याला कळत नसलं तरी त्याच्या बालमनाला ते त्रास देतय. त्यालाही बेचैनी येतेय. त्याचं भविष्य उजळायचं असेल तर दोघंही एकमेकांपासून कायमचे दूर व्हा.”
सुकांतला घेऊन कणिका, अवंतिकाबाई रात्री घराबाहेर पडल्या.
अवंतिकाबाई चार दिवस कणिकाच्या माहेरी राहिल्या. पण तिला म्हणाल्या, “अगं, व्याह्यांकडे राहणं बरं नाही. मी आपली जाते मालगुंडला. आपलं घर बरं. मला इथं राहणं प्रशस्त नाही वाटत, लोक संशय घेतात.”
“अहो, आई पण लोकांशी काय करायचंय? लोक येणारेत का अडचणीत मदतीला?”
“तसं नाही गंऽ. पण... तू इथे आलीस हे समजून घेतील. पण तुझ्याबरोबर मी आले म्हणजे संशयाची खसखस पिकणारच. म्हणून म्हणते.” शेवटी त्या गावी गेल्याच.
आता सुकांत पाच वर्षांचा झाला होता. कणिकाने त्याला शाळेत घातलं. आता आजी-आजोबांना काम लागलं. त्याला ने-आण करण्याचं.
सुकांत वरचेवर कणिकाला विचारायचा, “आई, आपण घरी कधी जायचं? मला पप्पांना भेटायचंय. आजीकडे कंटाळा आला. मला मुलं विचारतात, तुझे आई, बाबा का येत नाहीत शाळेत तुला सोडायला आणि न्यायला? मी काय सांगू?”
कणिकाला ह्या प्रश्नांची उत्तरं देणं अशक्य होतं. ती खूपच दु:खी व्हायची मनातून. “एवढ्याशा मुलाला सांगायचं काय?”
“तू सांग, माझे पप्पा दुबईला गेलेत. मम्मी जाॅब करते.”
“तूच म्हणतेस ना खोटं कधी बोलू नये.”
“हो पण, सध्या असं सांग तू सगळ्यांना. म्हणजे तुला कोणी विचारणार नाही.”
“तू खूप लहान आहेस. कधी-कधी खोटं बोलावं लागतं. तुला नाही कळणार ते.”
“तू पाहात होतास ना, तुझे पप्पा किती भांडायचे रोज माझ्याबरोबर.”
“पण पप्पांना सोडून तू इथे का आलीस?”
“तू पाहात होतास ना, तुझे पप्पा किती भांडायचे रोज माझ्याबरोबर.”
“मग आमच्या शाळेतल्या मुलांचे मम्मी-पप्पाही भांडत असतीलच ना. मग ते कसे राहतात एकत्र त्यांच्या घरी.”
त्या अजाण बालकाच्या चाणाक्षपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणं, कणिकाला खूप जड जात होतं.
“बरं आता दूध पी. चांदोमामा आलाय. तू झोप बरं. मी तुला गोष्ट सांगते. कोणती सांगू? शिवाजी महाराजांची? गौतम बुद्धांची? ध्रुव बाळाची?”
“नको नवीन गोष्ट सांग. त्या जुन्या झाल्या.”
कणिका मग काही तरी मनात जुळवाजुळव करून एखादी गोष्ट सांगायची. सुकांत झोपायचा. पण कणिका व्यथित व्हायची.
“आपला निर्णय चुकला का?”
“थोडे दिवस सहन केलं असतं. मग तोच केवल शांत झाला असता. आपण तडकाफडकी घर सोडलं. पुढल्या आयुष्याचं काय?”
“आई-बाबाही थकत चाललेत. त्यांचे सुखाचे, आरामाचे दिवस. मी त्यांना सांभाळायचं तर तेच मला सावरताहेत.”
एक दिवस कोर्टाची नोटीस घरी आली.
केवल, मुलगा सुशांतचा ताबा मागत होता. त्याबद्दल कणिकाचं काय म्हणणं आहे ते कोर्टात हजर होऊन सांगायचं होतं. केवलने वकिली सल्ला घेतला होता.
कणिका कोर्टात हजर झाली. तिने न्यायाधिशांना तिच्या घर सोडण्याची पार्श्वभूमी सांगितली. मुलाला जन्म मी दिलाय, तेव्हा मुलगा मलाच हवाय. मी त्याला नवऱ्याच्या ताब्यात देणार नाही.
त्यावर केवलच्या वकिलाने त्याच्या अशिलांचे म्हणणे कोर्टाला सांगितले.
“अशिलाची पत्नी जबरदस्तीने मुलाला आणि त्याच्या आजीला घेऊन घर सोडून माहेरी राहतेय. ही अशिलाची फसवणूक आहे. मुलाला वडिलांबद्दल खूप प्रेम आणि आवड आहे. तेव्हा कोर्टाने सुकांतचा ताबा अशिलाला द्यावा. त्याशिवाय त्याची पत्नी उद्या दुसरे लग्न करेल. म्हणजे मूळचा बाप बाजूला आणि सावत्र बाप, सुकांतचा पालनकर्ता हे पटत नाही. आमचे अर्जदाराला आणि दुसऱ्या नवऱ्यापासून केवल यांच्या पत्नीला मुले झाली, तर त्याला म्हणजे सुकांतला दुय्यम, परका समजून सावत्र बाप त्याच्यावर प्रेम करणार नाही. तो स्वत:च्या मुलांचेच लाड करेल. त्यांचीच फक्त जबाबदारी घेईल. ह्या छळाचा वाढत्या वयातल्या सुकांतच्या मनावर दुष्परिणाम होईल. कदाचित त्याचे आयुष्य उद्ध्वस्त हाेण्याची शक्यता आहे. वडील-मुलाची किरकोळ कौटुंबिक भांडणाने ताटातूट करणे अत्यंत गैर आहे. मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हादेखील पोलिसांत दाखल करता येईल. तेव्हा कोर्टाने मुलाचा सुकांतचा मागितलेला ताबा देण्याबाबत न्यायनिवाडा करावा सर.”