झक्काझक्की - भाग ४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:24+5:302021-09-24T04:27:24+5:30
“मी मुळीच ही असली बायकी काम करणार नाही. मी फोनवर महत्त्वाचं बोलतोय, दिसत नाही तुला?” “मुलगा काय फक्त माझाच ...

झक्काझक्की - भाग ४
“मी मुळीच ही असली बायकी काम करणार नाही. मी फोनवर महत्त्वाचं बोलतोय, दिसत नाही तुला?”
“मुलगा काय फक्त माझाच आहे का? तुम्हाला कधीच वेळ नसतो. तुम्ही पण कामचुकार आहात. जरा मला मदत केलीत तर काय बिघडेल? फोन नंतर करतो म्हणून सांगायचं. मुलापेक्षा तुम्हाला त्या मित्राशी गप्पा मारणं महत्त्वाचं वाटतं का?”
नंतर बराच वेळ भांडणाच्या लाह्या फुटत होत्या.
त्यात अवंतिकाबाईंनी मध्ये पेटती काडी टाकली.
“तू सुद्धा केवल, एका मुलाचा बाप झालास तरी तुला अजून साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत. बायको अणृभुजा देवी आहे का? तिची किती धावपळ होते. माझा हल्ली काहीच तिला मदतीचा हात नाही. डोळ्याचं ऑपरेशनचं तरी बघ”.
झालं. आणखी ठिणग्या उडू लागल्या.
“च्यायला, तुमची घरात राहयलो की सदैव कटकटच चालू असते. मी बाहेरच जातो दोन तास. मित्राने आज पार्टी ठेवलीय. हाॅटेलातच जेवण करून येईन. तुमची टाळकी शांत झाली की येईन. केवल निघून गेला.
दूध पिऊन सुकांत झोपला. आता कणिकाला नवऱ्याच्या तर्कटी स्वभावाची माहिती झाली होती. तिला काहीच वाटलं नाही.
कणिका घरच्या कटकटीला कंटाळून कामावर हजर झाली. अवंतिकाबाई सुकांतचं अतिशय काळजीपूर्वक आणि मातृप्रेमाने सर्व पालनपोषण करायच्या. केवल लक्ष देईना म्हणून कणिकाने अवंतिकाबाईंच्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन्स करून घेतली. दैवयोगाने त्यांना नवी दृष्टी आली. तशा त्या कामाला खंबीर होत्या. सुनेला मुलगी मानून खूप कौतुक करायच्या. दोघींमध्ये माय-लेकीचं नातं होतं. असे आपुलकीचे नाते दोघीचं भाग्यच उजळलं होतं.
रोज कोणत्याही कारणावरून कणिका आणि केवलची खडाजंगी चालायची. कारणं अगदी क्षुल्लक होती. कणिका शांत स्वभावाची होती, सहनशील होती; पण त्यालाही मर्यादा आहेतच ना. तीही आता कडाडून केवलला विरोधी बोलायची. मधल्यामध्ये सुकांतची मात्र परवड होत होती. रोजच्या गृहकलहाला कणिका आणि अवंतिकाबाई पार कंटाळल्या होत्या.
सौख्य छळी मज दु:खासम हे
डोळा दाटे नीर...
अशी सुखवस्तू संसारात अवस्था बिकट होत चालली होती.
एक दिवस अवंतिका बाईंनीच ठरवलं. या कटकटीचा सोक्षमोक्ष लावायचाच आज.
बेडरूमच्या गादीवरची चादर विस्कटलेली दिसली. या कारणावरून केवलचं डोकं फिरलं. तो तावातावाने वाट्टेल तसं बोलायला लागला. अवंतिकाबाई संधीची वाट पाहातच होत्या. त्यांनी आज आवाज तिसऱ्या पट्टीतला काढला.
“केवल, गेली सहा वर्षे मी पाहतेय, तुम्ही दोघंही सतत भांडण करता. शेजारच्या लोकांच्या तक्रारी येताहेत माझ्याकडे. तुमच्या लट्टाझोंबीमुळे त्यांना झोप लागत नाही. बोल काय करायचं? काय उत्तर देऊ मी त्यांना? मला आता लाज वाटत आहे.”
“शेजाऱ्यांना नवरा-बायकोच्या भांडणात पडण्याचा काय हकक आहे?”
“अरे मूर्खा पण तुम्ही मर्यादेपलीकडे आणि रोजच भांडता. त्यांना त्रास झाल्यावर ते तक्रार करणारच. भोवतीची शांतता नष्ट होत असताना कोण गप्प बसेल? आणि ते सहन तरी किती करणार? गप्प तरी किती दिवस राहणार? तुम्ही शहाणी माणसं जर असा ताळमेळ सोडून वागल्यानंतर कोणीही जाब विचारणाच. मी आज तुला स्पष्ट सांगते. तू कणिकाला घटस्फोट दे. ती तरी बिचारी ही तुझी लाथाळी किती दिवस सोसणार. तुमचं पटत नाही ना मग एकमेकांला सोडून द्या.”
“आई, तू हे बोलतेस? मला वाटलं नव्हतं तू असं बोलशील म्हणून?”
“मी बरोबर बोलतेय. वर तोंड करून जास्त बोलू नकोस. अति झालंय हे आता. तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना. असला आचरट प्रकार चाललाय तुमचा. कणिका तू सुकांतला घे. बॅग भर आणि जा आईकडे. तिथे सुखाने चार घास तरी खाशील. घटस्फोटाचा अर्ज दे.”
“सासूबाई, तुम्हीपण पाहिजेत मला. आजवर तुम्हीच मला आईचं प्रेम दिलंत. मी सांभाळीन तुम्हाला मरेपर्यंत.”
“वा ग वा, आणि सुकांतचं काय? तो माझा मुलगा आहे. त्याला नेता येणार नाही तुला आणि आईला पण?”