झक्काझक्की - भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:04+5:302021-09-24T04:27:04+5:30
केवल आणि कणिकाचंही असंच झालं. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या त्या वयात, त्या त्या गोष्टी घडल्या तर संसाराची ...

झक्काझक्की - भाग १
केवल आणि कणिकाचंही असंच झालं. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या त्या वयात, त्या त्या गोष्टी घडल्या तर संसाराची गाडी आपलं अंतव्य स्थान गाठू शकते. एकमेकांच्या भावना, विचार समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यात नैतिक स्वातंत्र्य, ज्याचं त्याला मिळणं ही आवश्यक असतं. आपल्या विचारांचा दबाव टाकून ‘मी म्हणेन तेच झालं पाहिजे’, ही वृत्ती संसारसुखाला दुभंग करते. मग होतात तंटे, वाद-विवाद.
घर म्हटलं की तिथे भांड्याला भांडं लागलं की आवाज होतो, तसं नेहमीच घडतं. त्याला चहाच्या पेल्यातली वादळंही म्हणतात. ती क्षणिक असतात. एकमेकाला दुसऱ्याची गरज लागते. फिरलेलं डोकं ठिकाणावर येतं. पुन्हा नीटपणे जीवन सुरू होतं. केवल आणि कणिका, दोघेही कमावते होते. म्हणजे कणिकाला पैशासाठी नवऱ्यापुढे हात पसरायची गरज नव्हती. दोघांनी आपापली खाती उघडून बँक बॅलन्स करीत होते.
दोघेही शिणून थकून घरी यायचे. केवल टीव्ही लावून आरामात बसायचा. कणिकाला पदर खोचून स्वयंपाकाला जुंपून घ्यावं लागे. सासूबाई अवंतिका काकू सकाळी तिला पुष्कळ मदत करायच्या; पण रात्रीचं त्यांना कमी दिसायला लागलं होतं.
एकदा त्यांनी अनावधानाने एक गंमतच केली. एका शेगडीवर काॅफीचं आधण आणि दुसरीवर आमटीची फोडणी करून वरण ओतलं. पण प्रकार वेगळाच झाला. त्यांनी वरणात मसाल्याच्या ऐवजी काॅफी पावडर टाकली, तर काॅफीच्या आधणात गोडा मसाला. प्रेमाने दोघांना काॅफीचे कप आणून दिले. मसाल्याचा वास. केवल म्हणाला, ‘अगं आई तू काॅफीऐवजी गोडा मसाला घातला आहेस. हे कसं पिणार?’
‘काय करू बाळा, दिसतच नाही रात्रीचं?’
त्या संध्याकाळपासून कणिकावर संध्याकाळच्या रसोईची जबाबदारी अंगावर पडली.
‘अहो, तोंडी लावणं काय करू?’
‘तुला हवं ते कर.’
‘घरात भाजी नाही. बटाटे, कांदे, मिरच्या संपलंय सारं.’
‘मग मी काय करू? जा घेऊन ये.’
‘म्हणजे तुमची काहीच जबाबदारी नाही का?
‘तू बायको आहे. हवं, नको ते तू बघायला हवं.’
‘जरा जा ना चौकात. उद्यालापण भाजी लागेलच ना डब्याला?’
‘ए बाइई, मी आता मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर, नाही तर हाॅटेलचा डबा मागव.’
अवांतिका बाई आत गेल्या. शेवग्याच्या शेंगा आहेत. त्या उकड आणि पिठलं कर. मीही विसरलेच. घरात बघायचं.’
‘पण आई, ह्यांचं हे असलं वागणं आणि बोलणं योग्य आहे का? मीपण दमूनच येते ना. बहुतेक वेळा मी भाजीपाला आणतेच. पण एखाद्या वेळेला तरी ह्यांना जायला काय झालं?’
‘अगं बाई, पुरुष असेच असतात हटवादी. हेसुद्धा असेच जमदग्नीचा अवतार होते. जरा मनाविरुद्ध झालं की हे घरात आकांडतांडव. पण समजून घ्यायचं नाही. बाईचं दोन्हीकडून मरण असतं. जाऊ दे उद्या मी सगळं आणते.’
कणिकाने जेवणाची पानं घेतली. सगळी ताटं वाढली.
‘अहो, चला जेवायला. एक तर उशीर झालाय आधीच आणि उद्या मला लवकर बाहेर पडायचंय.’
केवल पानावर बसला आणि त्याचं डोकं फिरलं.
‘हे काय पिठलं-भात फक्त? तुला कितीदा मी सांगितलंय मला पिठलं हा प्रकार आवडत नाही म्हणून. जेवा तुम्हीच. मी मुळीच खाणार नाही पिठलं-भात.’
‘केवल उगीच चिडू नकोस. एखादा दिवस येतो असा. म्हणून काय एवढा थयथयाट करायचा? जेव आता.’
आईचं काहीही न ऐकता, भरल्या ताटात पाणी ओतून केवल बेडरूममध्ये झोपायला गेला.’