अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, चौघे जखमी
By Admin | Updated: July 3, 2016 00:57 IST2016-07-03T00:57:54+5:302016-07-03T00:57:54+5:30
काळाचा घाला : वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला जात होते

अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, चौघे जखमी
आजरा : कोल्हापूर येथून आंबोलीकडे जाणाऱ्या कारची बेकरीमाल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक बसून कारमधील संदीप रघुनाथ कागले (वय ३१, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. तर विशाल विजय शिंदे (रा. कॉमर्स कॉलेजमागे, कोल्हापूर), विशाल डिगे (रिलायन्स मॉल शेजारी, कोल्हापूर), सागर पंडित जिनकर (रा. कणेरीनगर, कोल्हापूर), व अभिजित राऊत (शिवाजी पेठ, कोल्हापूर) हे चौघेजण जखमी झाले. दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळ व आजरा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संदीप कागले यांच्यासह पाचजण कोल्हापूरहून आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी कारने चालले होते. आजऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर खेडे गावनजीक त्यांच्या कारची वळणावर थेट नांदणीकडे चाललेल्या टेम्पोला जोरदार धडक बसली. यामध्ये कारचा पुढचा भाग पूर्णपणे सरकून मागे आला. त्यामध्ये संदीप हे जागीच ठार झाले, तर अन्य चारजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मृत कागले हे औषध विक्री प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. आठवड्यापूर्वी आपल्या कुं टुंबीयांसह याच मार्गे आंबोली येथे पर्यटनासोबत जाऊन आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई-वडील व अडीच वर्षांचा मुलगा आहे.
शनिवार पेठेत सन्नाटा
संदीप कागले हे मार्केटिंगचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच आमदार राजेश क्षीरसागर यांनी काही कार्यकर्त्यांना आजऱ्याकडे पाठविले. संदीप यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना सांगितली नव्हती. नातेवाईक आजूबाजूला येऊन थांबले होते. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह शनिवार पेठेतील घरी आणल्यानंतर नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संदीपचा स्वभाव मनमिळावू व बोलका होता.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.