५० वर्षात ‘गडहिंग्लज’चे २९ जवान शहीद !
By Admin | Updated: January 12, 2015 00:43 IST2015-01-12T00:39:42+5:302015-01-12T00:43:14+5:30
वीरांची भूमी : इंदिराजीनीही घेतली होती नोंद , विविध पुरस्कारांनी सन्मानित जवान

५० वर्षात ‘गडहिंग्लज’चे २९ जवान शहीद !
राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
१९६५ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धापासून अलीकडच्या कारगील युद्धापर्यंत आणि त्यानंतर वेळावेळी झालेल्या आतंकवादी हल्यांसह , कर्तव्य बजावताना झालेल्या दुर्घटना - अपघातात ‘गडहिंग्लज’च्या सुपूत्रांनी देशासाठी बलिदान दिले आहे. गेल्या ५० वर्षात तालुक्यातील तब्बल २९ जवान देशरक्षणाच्या सेवेत शहीद झाले आहेत.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी शोकसंदेश पाठवून येथील एका जवानाच्या हौतात्म्याची नोंद घेतली होती. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मुत्नाळ येथील बिंदू नारायण कुलकर्णी या तरूणाने अवघ्या १७ व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे कोल्हापूरातील भवानी मंडपानजीकचा चौक ‘बिंदू’ चौक नावाने ओळखला जातो, तर त्यांच्या जन्मगावी मुत्नाळमध्येही ‘बिंदू स्मारक’ उभारण्यात आले आहे.
हुतात्मा ‘बिंदू’पासून सुरू झालेली हौतात्म्याची ही मालिका लिंगनूरच्या सुनिल जोशिलकर यांच्यापर्यंत येवून ठेपली आहे. देशसेवा बजावताना विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्कार प्राप्त जवानांचाही या शहीदांमध्ये समावेश आहे. त्यांच्या पराक्रमाने तरूणांना बळ मिळते.
नूलच्या शिपाई बसाप्पा महार यांच्यापासून नेसरीच्या मेजर सत्यजीत शिंदे-नेसरीकर यांच्यापर्यंत २६ जवानांना लढाई व कारवाईत वीरमरण आले. सावतवाडीचे संतोष देसाई, जांभूळवाडीचे रवींद्र कांबळे आणि लिंगनूरचे सुनिल जोशिलकर यांना कर्तव्य बजावताना वीरगती मिळाली.