दारू जिंकली; व्यसनमुक्ती हरली!
By Admin | Updated: August 26, 2014 21:48 IST2014-08-26T21:44:55+5:302014-08-26T21:48:26+5:30
इतिहासाला कलंक : विशेष ग्रामसभेद्वारे मेढयात बाटली पुन्हा उभी राहिली

दारू जिंकली; व्यसनमुक्ती हरली!
मेढा : दारु दुकानमुक्त तालुका असा लौकिक असणाऱ्या जावळी तालुक्यात अवैध दारु विक्री सुरूच असल्यामुळे व पोलीस प्रशासनही ‘हतबल’ झाल्यामुळे मेढा येथे दारु दुकाने परत सुरू करावीत, असा ठराव आज विशेष ग्रामसभेत मतदानाने संमत करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त संघटनेच्या व महिलांच्या आवाजापेक्षाही दारु दुकाने सुरू करणाऱ्यांचा मोठा आवाज महिलांचीही अत्यल्प उपस्थिती यामुळे आजची ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. मात्र, आजच्या ग्रामसभेमुळे दारु जिंकली अन् बाटली उभी राहिली असाच निर्णय झाला.
या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुजीत जवळ होते. यावेळी उपसरपंच सर्व सदस्य, माजी सरपंच पांडुरंग जवळ, संतोष वारागडे, शशिकांत गुरव, विलास जवळ, विस्तार अधिकारी बोडरे, महिला आघाडीच्या फुलाबाई धनवडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. विलास जवळ यांनी ही ग्रामसभाच बेकायदा असून ती पुन्हा बोलविण्याची मागणी केली.
यावेळी उपस्थितांमधून गदारोळ सुरू झाला. वातावरण तापले यानंतर माजी सरपंच पांडुरंग जवळ यांनी सभेची सुत्रे हातात घेवून उपस्थितांना शांत केले.(प्रतिनिधी)