विलीनीकरणामुळे ‘चित्र’ पालटणार काय?
By Admin | Updated: September 5, 2015 00:10 IST2015-09-05T00:10:08+5:302015-09-05T00:10:08+5:30
कोल्हापूर चित्रनगरी : वेगवेगळे मतप्रवाह, विकासाची हवी हमी

विलीनीकरणामुळे ‘चित्र’ पालटणार काय?
इंदुमती गणेश -कोल्हापूर महाराष्ट्र सांस्कृतिक रंगभूमी, साहित्य, चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी गुरुवारी अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी कोल्हापूर चित्रनगरीचे महाराष्ट्र चित्रपट महामंडळ व पर्यायाने मुंबई चित्रनगरीमध्ये विलीनीकरण व्हावे, असा प्रस्ताव मांडला. त्यावर वेगवेगळी मते मांडली जात असून, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. १०) मुंबईत बैठक होणार आहे.
मुंबई चित्रनगरी आणि कोल्हापूर चित्रनगरी या दोन्ही संस्था शासनाच्याच अखत्यारित आहेत. त्यात मुंबई चित्रनगरी फायद्याचा व्यवसाय करत असल्याने त्याअंतर्गत कोल्हापूर चित्रनगरीचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. मुंबईतील मालिका व चित्रपट व्यावसायिकांना स्टुडिओ मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. कोल्हापूर चित्रनगरी मुंबईच्या अखत्यारित गेली तर तेथील निर्माते, दिग्दर्शकांना आपसूकच चित्रीकरणासाठी कोल्हापूरला जाण्याचा पर्याय दिला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला चित्रीकरण व्हावे, यासाठी वेगळी धडपड करावी लागणार नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन काही चित्रपट व्यावसायिकांचा आहे.
मात्र, काही चित्रपट व्यावसायिकांचा, विशेषत: चित्रनगरीशी भावनिकरीत्या जोडल्या गेलेल्या ज्येष्ठांचा या प्रस्तावाला विरोध आहे. विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीही मांडला गेला होता. चित्रनगरीच्या स्थापनेनंतर काही
वर्षे मराठी चित्रपट महामंडळाने ती फायद्यात चालवून दाखवली
होती.
मात्र, बदलत्या काळानुसार बदल स्वीकारला नाही म्हणून ती बंद पडली. त्यामुळे तिचे स्वतंत्रपणे पुनरुज्जीवन व्हायला हवे, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
शाश्वती हवी...
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटांचे आणि नंतर प्रादेशिक चित्रपटांचे, मालिकांचे चित्रीकरण व्हावे, अशी अपेक्षा आहे. विलीनीकरण झाल्यानंतर कोल्हापूर चित्रनगरी किंवा कलामहर्षी बाबूराव पेंटर चित्रनगरी कोल्हापूर हे नाव राहिले पाहिजे, मराठीला प्राधान्य दिले गेले पाहिजे, स्थानिक कलावंतांना रोजगार मिळायला हवा, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
विलीनीकरणास यापूर्वीही विरोध झाला होता. कोल्हापूर चित्रपट महामंडळाने चित्रनगरी फायद्यात चालवून दाखवली होती. शासनामुळे ती बंद पडली. आता पुन्हा प्रस्ताव मांडून ते चित्रपट व्यावसायिकांमध्येच वाद निर्माण करीत आहेत.
- भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते
चित्रनगरी विलीनीकरणाच्या प्रस्तावावर अगदीच मोघम चर्चा झाली आहे. त्यावर गुरुवारच्या बैठकीत चर्चा होणार असून, त्याचवेळी मला याची सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर मी चित्रपट व्यावसायिकांशी चर्चा करेन.
- विजय पाटकर, अध्यक्ष, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ
‘कोल्हापूर चित्रनगरी’ ही मूळ ओळख कायम ठेवून एकहाती कामकाज होऊन चित्रनगरी व्यवस्थितरीत्या चालवली जात असेल तर विलीनीकरणाला हरकत नाही. चित्रनगरीचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे आहे.
- यशवंत भालकर (दिग्दर्शक)
भावनात्मकरीत्या आम्ही चित्रनगरीशी जोडलेलो असलो तरी व्यावसायिकतेचा विचार करत कोल्हापूरची वैशिष्ट्ये आणि काही बाबींची शाश्वती मिळाली तर माझा विलीनीकरणाला विरोध नाही.
- सुभाष भुरके, दिग्दर्शक
चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला आहे. मुंबई चित्रनगरीचा आवाका, अनुभव आणि उलाढालही मोठी आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर चित्रनगरीचा विकास झाला तर चांगली गोष्ट असेल.
- मिलिंद अष्टेकर, उपाध्यक्ष, महामंडळ