लोकांचा कृतिशील सहभाग वाढविणार

By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-27T23:56:50+5:302015-05-28T00:58:31+5:30

कोल्हापूरची पर्यावरण स्थिती चांगली : रंगनाथ नाईकडे

Will increase the active involvement of the people | लोकांचा कृतिशील सहभाग वाढविणार

लोकांचा कृतिशील सहभाग वाढविणार

प्रश्न : कोल्हापूरची पर्यावरणाची स्थिती कशी आहे?
उत्तर : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरची निसर्गसंपदा विपुल आहे. राष्ट्रीय वननीतीप्रमाणे जिल्ह्यातील एकूण क्षेत्रांपैकी एकतृतियांश क्षेत्रावर वन असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहता प्रादेशिक वनविभाग आणि वन्यजीव विभाग यांच्या पातळीवर राज्याच्या पुढे कोल्हापूर आहे. स्वच्छ हवामान, योग्य ऋतुमान आणि मुबलक पाणी कोल्हापूरमध्ये आहे. पर्यावरणाबाबत कोल्हापूरची स्थिती चांगली आहे. मात्र, मानवी कृत्य आणि दुर्लक्षितपणामुळे धोक्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसल्याने नद्यांमधील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाबाबतचा दुर्लक्षितपणा थांबणे गरजेचे आहे.
प्रश्न : पर्यावरण रक्षण, संतुलनासाठी वनविभाग काय करणार आहे?
उत्तर : जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी १३९१.११ चौरस किलोमीटर क्षेत्र वनाखाली आहे. त्याची टक्केवारी १९.३५ इतकी आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील १३१ गावांचा पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणून पर्यावरण संतुलन राखण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. सिंचन, वीज अशा सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी वनविभागाच्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात मिळालेल्या गायरान तसेच अन्य पर्यायी जागांवर आकेशिया, निलगिरीऐवजी स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड केली आहे. त्यासह प्रत्येक तालुक्यांत जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. शिवाय ‘स्मृतिवन’ संकल्पनेद्वारे वनक्षेत्र वाढविण्यात येईल. जिल्ह्यातील ७२ गावांना जंगलातील पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा होतो. संबंधित पाणीसाठे ‘टॉप टू बॉटम’ भक्कम केले जाणार आहेत. वन्यजीव संरक्षणासाठी जंगलातच त्यांच्यासाठी पाणीसाठे आणि खाद्यनिर्मिती करण्याचे काम सुरू आहे. वनक्षेत्र वाढवून निसर्गसंपदेत भर टाकली जाईल. ‘निसर्ग पर्यटनातून लोकशिक्षण आणि लोकशिक्षणातून विकासाकडे’ हे ब्रीद घेऊन निसर्गपर्यटन वाढवून कोल्हापूरच्या विकासाला बळ देण्याचे नियोजन आहे.
प्रश्न : कोल्हापूरकरांनी काय केले पाहिजे?
उत्तर : पर्यावरणाच्यादृष्टीने कोल्हापूरची स्थिती चांगली आहे. मात्र, पर्यावरण रक्षणाबाबतचे सामाजिक दायित्व कमी होत असून त्याचा फटका धोकादायक वाटचालीकडे नेत आहे. आजचा दिवस कसा फायद्याचा जाईल या स्वरूपातील वृत्ती याठिकाणी वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाला घातक ठरणारे उद्योग, व्यवसायांची संख्या वाढत आहे. त्यातून हवा, पाणी प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी जिल्ह्यात सामूहिक प्रयत्न निश्चितपणे झाले पाहिजेत. मात्र, त्याची सुरुवात प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर करावी. त्यात इको फ्रेंडली घरांची बांधणी, विजेचा कमी वापर, वाहनांचा आवश्यक तेथेच वापर, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे, पर्यावरणपूरक उद्योग, व्यवसाय करणे हे कोल्हापूरकरांनी केले पाहिजे. वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न झाल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने कोल्हापूर निश्चितपणे पहिल्या क्रमांकावर येईल.
प्रश्न : जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने कोणते नियोजन केले आहे?
उत्तर : प्रत्येक मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत पर्यावरणाशी बांधला गेला आहे. पर्यावरणाचा संबंध केवळ श्वसनापुरता मर्यादित नसून तो आपल्या दैनंदिन जगण्याशी निगडित आहे. आजच्या युगातील प्रत्येक गोष्टीला विज्ञानाने पर्याय दिला आहे. पाणी, हवा यांना कोणताही शाश्वत असा पर्याय अजूनही सापडलेला नाही. ते लक्षात घेऊन आपण सर्वांनी पर्यावरण रक्षण, संतुलनासाठी कार्यरत राहिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र संघातर्फे ‘सेव्हन बिलियन ड्रिम्स, वन प्लॅनेट कंझुम विथ केअर’ हे बोधवाक्य घेऊन ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जाणार आहे. यावर्षी पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमांमध्ये लोकांचा कृतिशील सहभाग वाढविण्यात येईल. त्यांना याबाबत सातत्याने कार्यरत ठेवण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जातील. त्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पर्यावरण चळवळीशी संबंधित संस्था, शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांना सहभागी केले जाईल. विशेषत: संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि पर्यावरण परिस्थितीय विकास समिती यांचा सक्रिय सहभाग राहण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबविण्यात येतील.
- संतोष मिठारी

Web Title: Will increase the active involvement of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.