एकट्याचेच २४ टॅँकर कशासाठी

By Admin | Updated: September 8, 2016 00:50 IST2016-09-08T00:49:58+5:302016-09-08T00:50:36+5:30

सतेज पाटील यांचा सवाल : ‘गोकुळ’च्या सभेनंतर झाली समांतर सभा

Why alone 24 tankers | एकट्याचेच २४ टॅँकर कशासाठी

एकट्याचेच २४ टॅँकर कशासाठी

कोल्हापूर : ‘अमूल’ची भीती घालण्यापेक्षा तुमचा खर्च कमी करा. त्यामुळे तीन रुपये कमी होतील आणि ते दूध उत्पादकांना देता येतील. मात्र, एकट्याचेच २४ टँकर लावून महिन्याला ४५ लाख रुपये त्यांच्या घशात घालता म्हणूनच सकाळी नऊ वाजता ते ‘गोकुळ’मध्ये येऊन बसतात, अशी खरमरीत टीका आमदार सतेज पाटील यांनी समांतर सभेत केली.
सभा झाल्यानंतर मंडपातून पाटील आणि त्यांचे समर्थक थेट रस्त्यावर आले. दुग्ध साहाय्यक निबंधकांच्या कार्यालयासमोरच त्यांनी समांतर सभेला सुरुवात केली. पाटील यांच्यासह नेतेमंडळींनी डिव्हायडरवर उभारून आपली भाषणे केली. यावेळी पाटील म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत उलट काही बोलायचं नाही, असं आम्ही ठरवून होतो. सभासद, दूध उत्पादक, महिला यांना न्याय मिळावा म्हणून आम्हाला सभा चालवायची होती. कारण त्यांना काहीतरी कारण काढून सभा उधळायची होती; परंतु माझ्या पाच प्रश्नांची उत्तरे न देता शहरातील माणसे पुढे करून ही सभा उधळली.
मुंबईत वेगळ्या नावाने एक दूध सुरू केले. २० लाखांच्या पिशव्या छापल्या तेव्हा कर्नाटकातील नंदिनी संस्थेने त्या नावावर आक्षेप घेतला. २० लाखांच्या पिशव्या बाद कराव्या लागल्या. हे उत्पादकांचे नुकसान आहे. जरी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसली तरी याबाबतचा कायदेशीर लढा यापुढेही चालू राहील. ‘गोकुळ’च्या कुठल्या गोष्टींचे टेंडर निघाल्याचे दाखवा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. बाबासाहेब देवकर यांनी प्रास्ताविक केले, तर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी ‘गोकुळ’च्या संचालकांचा निषेध केला.
वॉटर पार्क ते सभास्थळ
‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शक्तिप्रदर्शन करून सत्तारूढांना प्रश्नांच्या कोंडीत पकडण्यासाठी आमदार सतेज पाटील व समर्थकांनी व्यूहरचना केली होती. बुधवारी ते सर्वजण सकाळी ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये एकत्र आले. सकाळी ११ वाजता आमदार पाटील वॉटर पार्कवर आले. तिथे ते म्हणाले,‘ ‘गोकुळ’ची सभा शांततेच्या मार्गाने हाताळायची आहे. दूध संघात गोंधळाचा कारभार सुरू आहे. नेते भ्रष्टाचारात गुंतले आहेत. दूध उत्पादक, कामगार यांच्यासाठी लढा तीव्र करु. आमच्याकडे लेखापरीक्षण अहवाल आहे. त्यानंतर सर्वजण ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाकडे गेले.
सतेज पाटील गट सक्रिय
महापौर अश्विनी रामाणे, काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब माळी व एकनाथ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, करवीर पंचायत समितीचे सभापती स्मिता गवळी, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, गडहिंग्लज कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, बाळासाहेब कुपेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, विजयसिंह मोरे, कागल पंचायत समितीचे सभापती भूषण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर व मधुकर देसाई, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, मार्केट समिती उपसभापती मधुकर देसाई, शामराव देसाई (भुदरगड), आदी कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते.
‘गोकुळ बचाव’च्या टोप्या!
सतेज पाटील समर्थकांनी वॉटर पार्क येथून गोकुळ सभागृहाजवळ जाईपर्यंत डोक्यावर ‘गोकुळ बचाव’ लिहिलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या. शक्तिप्रदर्शन करीत समर्थक ‘गोकुळ’ कार्यालयाकडे जाताना त्यांनी सतेज पाटील यांच्या विजयाच्या, तर ‘गोकुळ बचाव’ व शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव दिलाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
खुर्च्या नसल्याने ‘वेटिंग’
आमदार पाटील मुख्य प्रवेशद्वारातून आत आले. तोपर्यंत त्यांना सभास्थळी बसण्यासाठी खुर्च्या शिल्लक नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे ते प्रवेशद्वारातच प्रमुख सभासदांसह सुमारे अर्धा तास थांबून राहिले. सभास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे गृहीत धरुन सभासदांना बसण्यासाठी किमान तीन हजार खुर्च्या ठेवणे आवश्यक होते. त्यानंतर ते सर्व समर्थकांसह सभामंडपात गेले. त्यांच्या समर्थकांनी व्यासपीठासमोरील रिकाम्या जागेत जमिनीवर बसणे पसंत केले. (प्रतिनिधी)


दूध संस्थेचे बोगस ठरावधारक
सभेस सत्तारूढ आणि विरोधकांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती. त्यामुळे दोन्हीही गटांकडून जास्तीत-जास्त सभासद सभेसाठी उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्यात आली होती; पण या सभास्थळी जिल्ह्यातील काही दूध संस्थांच्या बोगस ठरावाच्या प्रती घेऊन काही सभासद सत्तारूढांनी उपस्थित ठेवल्याचाही आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सभा आम्ही जिंकली
सत्तारुढांनी सभा उधळली असली तरी सभासदांच्या मनात आम्ही गेलो आहोत. ही सभा आम्ही जिंकली आहे. केवळ एका सभेपुरता हा विषय नाही तर याही पुढच्या काळात अशीच साथ द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.
हिंमत असेल तर टँकरचे भाडे कमी करा..
कोल्हापूर ते वाशी दूध वाहतूक टँकरला ‘वारणा’चा दर १.०५ रुपये, तर ‘गोकुळ’चा १.४० रुपये आहे. हे जादा पैसे कशासाठी देता? ते कमी करण्याची हिंमत दाखविणार का? असा सवाल पाटील यांनी केला.

Web Title: Why alone 24 tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.