वारसदारांचा भरणा पाहिल्यांनतर ’डावे-उजवे’ कोणाला म्हणायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:15+5:302021-04-04T04:23:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट असून, जे दूध उत्पादकांचे भले करू शकतात, त्यांच्यासोबत जायचे ...

वारसदारांचा भरणा पाहिल्यांनतर ’डावे-उजवे’ कोणाला म्हणायचे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट असून, जे दूध उत्पादकांचे भले करू शकतात, त्यांच्यासोबत जायचे आहे. मात्र, दुर्देवाने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांच्या वारसदारांचा भरणा पाहिल्यानंतर डावे-उजवे कोणाला म्हणायचे? असा प्रश्न पडतो. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना दूध उत्पादकांचे दुखणं कसे कळणार? असा सवाल करत एकूणच निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, याबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.
‘गोकुळ’ची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत विरोधी आघाडीसोबत असणारे राजू शेट्टी यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. सत्तारूढ आघाडीचे नेते महादेवराव महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन ‘गोकुळ’ वाचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. विरोधी आघाडीकडून मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी म्हणाले, ज्याला उमेदवारी हवी आहे, त्याने दहा लिटर दूध काढून दाखवावे, ही भूमिका आजही आहे. ज्या व्यक्तीचा जनावरे, दूध व त्या व्यवसायाशी काहीही सबंध नाही, अशी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली मंडळी दुर्देवाने दोन्हीकडे दिसतात. ‘गोकुळ’चा राज्याच्या दूध व्यवसायावर परिणाम होतो. येथे चांगला दर मिळत असल्याने सर्वांनाच त्याप्रमाणे देणे बंधनकारक होते. त्यामुळे हा संघ चांगल्या लोकांच्या हातात राहिला पाहिजे, ही आमची भूमिका असून, येत्या दोन दिवसांत पाठिंब्याचा निर्णय जाहीर करू, असे शेट्टी यांनी सांगितले.
मानसिंगराव गायकवाड ‘शाहू’ आघाडीसोबतच
जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. जे पक्षाची भूमिका तीच माझी असेल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आपल्या तीन-चार बैठका झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय मदतीमुळेच ‘गोकुळ’ भक्कम
‘एनडीडीबी’, केंद्र सरकार व राज्य सरकारकडून सातत्याने कोट्यवधीची मदत मिळत असल्याने संघ भक्कम झाला. त्यात आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके यांनी बसवून दिलेली घडीही महत्त्वाची असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.