वाचन समाजासाठी अत्यावश्यक गरज कधी होणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:45+5:302021-04-23T04:25:45+5:30

मुरगूड : समाजात वाचनाविषयीची अनास्था दूर होऊन ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक गरज कधी ...

When will reading become an essential need for the society ...? | वाचन समाजासाठी अत्यावश्यक गरज कधी होणार...?

वाचन समाजासाठी अत्यावश्यक गरज कधी होणार...?

मुरगूड : समाजात वाचनाविषयीची अनास्था दूर होऊन ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक गरज कधी ठरणार, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक जीवन साळोखे यांनी उपस्थित केला. जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. घराघरात सर्व जण एकत्र बसून टीव्ही बघत बसतात, तसे काही काळ सर्वजण पुस्तकांचे वाचन करतील तो दिवस खऱ्या अर्थाने पुस्तक दिन ठरेल, वाचन प्रेरणा दिन ठरेल, अशी अपेक्षाही साळोखे यांनी यावेळी व्यक्त केली. वाचन संस्कृती वाढण्यासाठी, वाचक संस्था विस्तारण्यासाठी गेली १५-१६ वर्षे ते एकहाती ग्रंथदान हा उपक्रम प्रत्यक्षात राबवत असून जिल्ह्यातील अनेक शाळा-महाविद्यालये, वाचनालये, सहकारी शिक्षक, पत्रकार, विद्यार्थ्यांना व मान्यवरांना ते पुस्तके भेट देत आले आहेत. सुमारे ९ हजार पुस्तके त्यांनी या काळात वाटली आहेत.

साळोखे म्हणाले, वाचनाचे, पुस्तकांचे महत्त्व नव्याने सांगण्याची वेळ सध्या आली आहे.

आपल्या भाषेतील उत्तमोत्तम, वाचनीय पुस्तकांकडे पाठ फिरवणे, वृत्तपत्रापलिकडे काही पूरक वाचन करण्याचा कंटाळा करणे यातच आपल्याकडील सुशिक्षित व नोकरीत असणारा मोठा वर्ग धन्यता मानतो. वाचन करणे म्हणजे वेळेची नासाडी करणे, वेळेचा दुरुपयोग आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या शरीराबरोबरच मनाचे, बुद्धीचे, भावनांचे भरण-पोषण होणे तेवढेच आवश्यक आहे, हे आपण का पटवून घेत नाही, असे ही ते म्हणाले.

एका बाजूस सध्याचे युग हे तीव्र स्पर्धेचे, माहिती व तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असणारे युग आहे, असे सर्रास म्हटले जाते. तरीही वाचनाची, पुस्तकांची घोर उपेक्षा सर्वत्र केली जाते, हे चित्र समाजाच्या भल्याचे नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वाचन संस्कृती योग्यरित्या रुजविल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच ग्रंथदान व पुस्तक भेटीसारखे उपक्रम प्रत्येक वाचनप्रेमी व ग्रंथप्रेमींनी राबवले पाहिजेत, त्यातच जागतिक पुस्तक दिनासारख्या कार्यक्रमांचे यश आहे, असेही साळोखे शेवटी म्हणाले.

Web Title: When will reading become an essential need for the society ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.