विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय ?
By Admin | Updated: July 30, 2014 00:29 IST2014-07-30T00:14:22+5:302014-07-30T00:29:59+5:30
दिलीप पाटील : टोलबाबत महायुतीचे नेते दुटप्पी

विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय ?
कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामे केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार देण्याचे काम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असताना विरोधकांकडून त्यांना बदनाम करण्याचे षड््यंत्र सुरू आहे. कर्तृत्वशून्य विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय? असा सवाल कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला. टोलला जन्म देणारे महायुतीचे नेतेच टोल हद्दपार करण्याची भाषा करत आहेत, ही दुटप्पी भूमिका जनतेने ओळखल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन कसे करता येईल, हे कृतीने दाखवून दिले आहे. त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावली आहे. दुष्काळ निवारण, जलसंधारण, मराठा समाजाला आरक्षण, आदी भरीव कामे त्यांनी केली. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कॉँग्रेसने एन्रॉन प्रकल्प आणला; पण विरोधकांनी त्यात खोडा टाकला आणि पुन्हा सुरू केला. आता जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प मार्गी लावून राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही विरोध करून बंद पाडण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपची मंडळी करत आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांवर आरोप करण्याचे काम ही मंडळी करत आहे; पण पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे. टोल आकारणीचे काम देशात सर्वप्रथम चंद्राबाबू नायडू यांनी केले. ते सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबई-बंगलोर महामार्ग, मुंबईतील प्लायओव्हरवर प्रथम शिवसेना व भाजपनेच टोल लावला. ही टोल जन्माला घालणारी मंडळीच तो रद्द झाला पाहिजे, अशी वल्गना करत आहेत. ही दुटप्पीची टीकाही पाटील यांनी केली.