‘आम्ही गडहिंग्लजकरां’चा महालक्ष्मी यात्रेस विरोध

By Admin | Updated: January 21, 2015 23:55 IST2015-01-21T23:45:14+5:302015-01-21T23:55:00+5:30

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन : नियोजित यात्रा रद्द करण्याची मागणी

'We protest against the Mahalaxmi Yatra of Gadhangljkaran' | ‘आम्ही गडहिंग्लजकरां’चा महालक्ष्मी यात्रेस विरोध

‘आम्ही गडहिंग्लजकरां’चा महालक्ष्मी यात्रेस विरोध


गडहिंग्लज : मे २०१५ मध्ये होणारी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा रद्द करण्यात यावी, अशी मागणी ‘आम्ही गडहिंग्लजकरां’नी शिष्टमंडळाने भेटून निवेदनाद्वारे येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यात्रेसंदर्भात झालेल्या प्राथमिक बैठकीत बहुसंख्य नागरिक व विश्वस्तांनी यात्रेला विरोध केला असतानाही यात्रा समितीने यात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी शासनाकडून सव्वा कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्याकामाची वर्कआॅर्डर ठेकेदाराला देण्यात आली आहे. यात्रेमुळे हे काम रेंगाळले, तर सरकारी निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
गडहिंग्लज शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे ५० हजार, तर एकूण कुटुंबांची संख्या आठ हजार आहे. सुमारे दहा लाख लोक यात्रेला येण्याची शक्यता आहे. मे मध्ये पाणीटंचाई असते. त्यामुळे आठवडाभर चालणाऱ्या यात्रेत पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य नाही.
शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, यात्रेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणे, वाहतूक व गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मिरवणुकीतील चेंगराचेंगरी, महिलांची छेडछाड, चेन स्नॅचिंग व पाकीटमारी, व्यसनी लोकांचा उपद्रव, ध्वनिप्रदूषण, अन्नातून होणारी विषबाधा, अस्वच्छतेमुळे होणारे साथीचे आजार आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार आहे.
गडहिंग्लजमधील आठ हजार कुटुंबांना यात्रेसाठी घर दुरुस्ती, रंगरंगोटी, शाकाहारी-मासांहारी भोजन, दारू, पाहुण्यांचा मानपान, आदींसाठी प्रत्येक कुटुंबाला किमान एक लाख रुपये खर्च येणार आहे. बहुसंख्य गरीब नागरिकांना हा खर्च परवडणारा नाही. यात्रेत हजारो कोंबड्या व बोकडांचा बळी दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मौल्यवान पशुधन वाया जाते. दारूच्या वापरामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका आहे.
नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आणि मनुष्यबळ लक्षात घेता दहा लाख लोकांची व्यवस्था पालिकेकडून शक्य नाही. शासनाकडून यात्रेसाठी कोणताही खास निधी पालिकेला मिळालेला नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर अ‍ॅड. दशरथ दळवी, प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. पी. डी. पाटील, उज्ज्वला दळवी, शिवाजीराव नाईक, प्रा. रमेश तिबिले, अलका भोईटे, नीलेश शेळके, शारदा अजळकर, प्रा. शंकर नेर्ले, सुनंदा गुंडे, सविता चव्हाण, ऊर्मिला कदम, आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)


देवा-धर्माला विरोध नाही
ग्रामदैवत काळभैरी व हाळलक्ष्मीची यात्रा दरवर्षी होते. नवरात्रीत महालक्ष्मी देवीचा उत्सव नऊ दिवस केला जात असल्यामुळे महालक्ष्मी यात्रेचा खर्च व संभाव्य समस्या टाळणे शक्य आहे. आमचा देवा-धर्माला विरोध नाही. मात्र, सामाजिकदृष्ट्या व व्यवहार्य नसलेली नियोजित यात्रा रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: 'We protest against the Mahalaxmi Yatra of Gadhangljkaran'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.