मुरगूडला आठवड्यातून तीनच दिवस पाणीपुरवठा
By Admin | Updated: October 20, 2015 23:45 IST2015-10-20T21:03:53+5:302015-10-20T23:45:33+5:30
सर्वपक्षीय ग्रामसभेत झाला निर्णय : श्रमदानातून होणार सर पिराजीराव तलावाची स्वच्छता

मुरगूडला आठवड्यातून तीनच दिवस पाणीपुरवठा
मुरगूड : पावसाने अत्यल्प हजेरी लावल्याने मुरगूड शहरासह यमगे शिंदेवाडी गावांना पिण्याचे पाणी पुरवणारा सर पिराजीराव तलाव भरलेला नाही. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाऊ नये यासाठी बोलावलेल्या ग्रामसभेत पाणी वाचविण्यासाठी शहराला तसेच यमगे, शिंदेवाडी गावांना आठवड्यातून तीनच दिवस पिण्याचे पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला. पुढील आठवड्यापासून त्याची अमंलबजावणी होणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेखा सुधीर सावर्डेकर होत्या. पाणीपुरवठा समितीचे सभापती संतोष कुमार वंडकर यांनी प्रास्ताविक केले.
माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी सर पिराजीराव तलाव भरण्यासाठी अवचितवाडी, चिमगाव, आदी गावांच्या नागरिकांनी योगदान दिल्याचे सांगून, मार्च, एप्रिल २०१६ मध्ये पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. वर्षअखेरीस पाणी योजना राबविणार असून, महिना अखेरीस सर्व नळांना मीटर बसविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दलितमित्र डी. डी. चौगले यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगून मुरगूड शहराला पाण्याची समस्या कधीच भेडसावली नसल्याने पाण्याची किंमत नागरिकांना माहीत नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करावे. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके म्हणाले, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून, पालिकेने कठोर पावले उचलण्याचा प्रयत्न करावा. मुख्याधिकारी बी. एस. जगताप, व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शहा, समोनाथ यरनाळकर, जयवंत हावडा, डा. संजय वडेर, पांडुरंग पुजारी, हाजी धोंंडिबा मकानदार, सूर्यकांत खराडे, धोंडिराम शिंदे, आदींनी सूचना मांडल्या. सभेस उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, विरोधी पक्षनेता किरण गवाणकर, अनंत फर्नांडीस, विलास गुरव, सुहास खराडे, दगडू शेणवी, सुधीर सावर्डेकर, बजरंग सोनुले, दिग्विजय पाटील, रोटरीचे अध्यक्ष बी. एस. खामकर, किरण कुंभार, नामदेव भांदिगरे, प्रकाश पोतदार, अनिल गंदमवाड, अमर कांबळे उपस्थित होते. दगडू शेणवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
मुख्याधिकाऱ्यावरू तू-तू, मै-मै --माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी मुख्याधिकारी बी. एस. जगताप हे हजर नसतात, असा आरोप करून त्यांनी जबाबदारीने वागावे असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे काम याबाबतची माहिती संतोष वंडकर यांच्यासह प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितली. शहरातील महत्त्वाच्या योजना पूर्ण होण्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगून विनाकारण गैरसमजुती पसरवू नका, असे आवाहन पाटील यांनी केले.