तुळशी नदीपात्रात पाण्याची पातळी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:56+5:302021-05-31T04:18:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : कोरोनासारख्या महामारीच्या काळातच तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यांची बरगे पाटबंधारे खात्याने मे महिन्यातच काढली ...

तुळशी नदीपात्रात पाण्याची पातळी घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : कोरोनासारख्या महामारीच्या काळातच तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यांची बरगे पाटबंधारे खात्याने मे महिन्यातच काढली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तुळशी नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बंधाऱ्यांना बरगे त्वरित घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
पावसाळ्याला अजून प्रारंभ झाला नसताना पाटबंधारे खात्याने अचानकपणे तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यांची बरगे काढली आहेत. पाण्याची पातळी घटल्याने शेकडो एकर शेतीला होणारा पाणी पुरवठा बंद होऊ लागला आहे. अनेक गावांच्या सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे शेती पाणी उपसा पंप पाण्याअभावी बंद पडू लागले आहेत.
तुळशी नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्याने शेती पाणी उपसा पंपांना पाणी पुरत नाही. सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत. ऐन कोरोनाच्या काळात आता शेती, पाणी व जनतेच्या पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. तुळशी नदीपात्रात पाण्याची दहा फूट पातळी ठेवणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
चौकट १ ) - भातपिकांच्या पेरण्या थांबल्या
तुळशी नदीपात्रात पाण्याची पातळी घटल्याने खरीप हंगामातील भातपिकाच्या पेरणीची कामे थांबल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
चौकट २ ) एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाणीटंचाई
पावसाळा अद्याप सुरू झालेला नसताना एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाणीटंचाई अशा दुहेरी संकटांना ग्रामीण जनतेला तोंड द्यावे लागत आहे.
फोटो ओळ = गेल्या दोन दिवसांपासून तुळशी नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.