अवचितवाडी तलावातील पाणी संस्थेचे बांधकाम रोखले
By Admin | Updated: November 20, 2015 00:06 IST2015-11-19T23:55:16+5:302015-11-20T00:06:21+5:30
वाद चिघळण्याची शक्यता : प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ - कामगारांत हमरीतुमरी

अवचितवाडी तलावातील पाणी संस्थेचे बांधकाम रोखले
मुरगूड : अवचितवाडी (ता. कागल) येथील उपराळा तलावामध्ये शेती गेलेल्या जमिनीमालकांच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करून पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गावाबाहेरील लोकांना घेऊन स्थापन केलेली पाणी संस्थाच बोगस असल्याचा आरोप करून तलावाच्या शेजारी सुरू असलेल्या पाणी संस्थेचे बांधकाम बंद पाडले. यावेळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली.
मुरगूड शहरापासून तीन किलोमीटरवर अवचितवाडी येथे दोन वर्षांपूर्वी आठ ते दहा कोटी रुपये खर्च करून शासनाने तलाव पूर्ण केला आहे. तलावामध्ये अवचितवाडीतील चाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यापैकी बारा शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तसेच नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.
खोटी कागदपत्रे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सादर करून चिमकाई पाणी वापर संस्थेची स्थापना केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तलावाच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन मोटार पंप हाऊसचे बांधकाम सुरू होते. ज्या जागेत बांधकाम केले जात आहे, त्या जागेच्या मालकांची परवानगीही घेतली नाही. याप्रकरणी गुरुवारी घटनास्थळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. पोलीस आल्यानंतर बांधकाम बंद केले. महादेव वगदे, दत्तात्रय कारंडे, संजय आंगज, बाबूराव भारंडे, पांडुरंग भाईगडे, विमल मोरबाळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
संस्थेची चौकशी करा
चिमकाई पाणी वापर संस्थेच्या स्थापनेसाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून, शेतकऱ्यांच्या मान्यतासुद्धा खोट्या आहेत. या संस्थेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तानाजी मोरबाळे यांनी केली.
संस्था खासगी आहे. शासनाने मान्यता दिली आहे, पण या सस्थेच्या पंप हाऊससाठी शासकीय हद्दीमध्ये बांधकाम करण्यास आपण परवानगी नाकारली आहे. पण संस्था बांधकाम नेमके कोठे करीत आहे हे आपण पाहू. प्रकल्पग्रस्त व संस्था शासकीय अधिकारी लवकरच चर्चा करू.
- आर. पी. डवरी, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर