चारीही सीमांवर भरारी पथकांचा ‘वॉच’ राहणार
By Admin | Updated: October 18, 2015 01:22 IST2015-10-18T00:33:29+5:302015-10-18T01:22:37+5:30
महापालिका निवडणूक : दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क झाले सक्रीय

चारीही सीमांवर भरारी पथकांचा ‘वॉच’ राहणार
एकनाथ पाटील / कोल्हापूर
कार्यकर्त्यांना दारू, मटन दिल्याशिवाय प्रचाराला रंग चढत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांसह पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या चारीही सीमांवर (बॉर्डर) २४ तास ‘वॉच’ ठेवला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी कार्यकर्त्यांपर्यंत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मातब्बर उमेदवारांच्या प्रतिष्ठेमुळे काही प्रभागांत तणाव निर्माण होत आहे. त्यातच कार्यकर्ते दारू पिऊन वावरत असल्याने वादावादीचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून सुमारे अडीच लाख किमतीचा विदेशी मद्याचा साठा टेम्पो ट्रॅव्हलरमधून कोल्हापुरात घेऊन जात असताना राधानगरी-कोल्हापूर रोडवरील तलवार चौकात भरारी पथकाने पकडला होता. याप्रकरणी टेम्पोचालक रोहित रामदास भोसले (रा. जवाहरनगर) याच्याकडे चौकशी केली असता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठा आणल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे मद्य विक्री करणाऱ्या दुकानांच्या विक्रीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्यास कारवाई करण्याची तयारी केली आहे.
वाहनांची कसून तपासणी
गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने शहरातील उमेदवारांसह पंटरांचा या ठिकाणाहून ट्रक भरून मद्यसाठा आणण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
टोलनाक्यावर गस्त
विशेषत: गोव्याहून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होण्याची शक्यता असल्याने तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा हे पाच तपासणी नाके सील केले आहेत. त्याचबरोबर शहरातील शिये, शिरोली, उचगाव, शाहू, कळंबा, पुईखडी, फुलेवाडी, सरनोबतवाडी, आर. के. नगर या नऊ नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व महापालिकेच्या विशेष भरारी पथकांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात आली आहे.