बाराची झोप सोडून शाहूवाडी गाठावी लागली हेच यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:32+5:302021-03-27T04:25:32+5:30
कोल्हापूर : आम्ही पॅनल उभे करतोय म्हटल्यावर लगेच मनधरणी करण्यासाठी जुन्या लोकांच्या भेटीसाठीसाठी पळावे लागले. बाराची झोप साेडून शाहूवाडी ...

बाराची झोप सोडून शाहूवाडी गाठावी लागली हेच यश
कोल्हापूर : आम्ही पॅनल उभे करतोय म्हटल्यावर लगेच मनधरणी करण्यासाठी जुन्या लोकांच्या भेटीसाठीसाठी पळावे लागले. बाराची झोप साेडून शाहूवाडी गाठावी लागली, हे आमचे पहिले यश आहे, असा सणसणीत टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पी.एन. पाटील व महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता लगावला. यशाची इतकी खात्री आहे, तर एवढी धावपळ आणि न्यायालयात चकरा कशासाठी, अशी विचारणाही केली.
कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर औपचारिक गप्पा मारताना पालकमंत्री पाटील यांनी गोकुळ निवडणूक घडामोडींवर भाष्य केले. सत्यजित पाटील सरूडकर यांचा गैरसमज दूर करू, असे सांगताना मंत्री पाटील यांनी महाडिक व पी.एन. यांना बाहेर पडावे लागते, याचा अर्थ जनतेला कळतो, असा चिमटा काढला. आतापर्यंत त्यांच्याकडे येणारे आणि हे त्यांच्याकडे जात आहेत, यावरून वारे उलटे फिरू लागले आहे हे देखील स्पष्ट होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. निवडणुकीतील यशाची इतकी खात्री आहे, तर मग उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा चकरा कशासाठी सुरू आहेत. स्थगितीसाठी प्रयत्न करण्याऐवजी थेट रणांगणात लढण्यासाठी केव्हाही सज्ज आहोत, असे का म्हणत नाहीत, अशी विचारणाही केली. गोकुळ सक्षमपणे चालावे हीच आमची भूमिका आहे, मुंबईत अमूल वेगाने घुसत असताना गोकुळ मात्र कमिशनच्या नादाने तेथील बाजारपेठ गमावत आहे. कमिशनला चटावून केले जाणारे संघाचे नुकसान, उत्पादकांना लिटरला दोन रुपयांची वाढ, पशुखाद्याचे वाढीव दर या मुद्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, आमचा हेतू शुद्ध आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
आमची विरोधी आघाडी भक्कम आहे, कोणताही गोंधळ उडणार नाही, याची खबरदारी आधीच घेतली आहे. उमेदवारीसंदर्भात आमच्यासोबत असलेल्या सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे. तालुक्यांच्या मतांच्या टक्केवारीनुसार उमेदवार निवडले जाणार आहेत. मी व मुश्रीफ एकत्रितपणे उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
चौकट ०१
आमदार राजेश पाटील यांची मेख
आमदार राजेश पाटील यांचे अजून तळ्यातमळ्यात सुरू असल्याबद्दल विचारले असता मंत्री पाटील यांनी हा मुश्रीफ यांच्या अखत्यारील विषय असल्याचे सांगताना दौलत कारखाना चालविण्यास देण्यावरून त्यांच्यात काहीशा कुरबुरी आहेत, त्याही चर्चेने सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.