प्रभाग रचनेची तारीख दोन दिवसांत
By Admin | Updated: July 26, 2015 00:42 IST2015-07-26T00:39:18+5:302015-07-26T00:42:16+5:30
महापालिका निवडणूक : उत्सुकता शिगेला; प्रथमच महिलांना ५० टक्के संधी

प्रभाग रचनेची तारीख दोन दिवसांत
कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यावरील आरक्षण जाहीर होण्यास आता काही दिवसांचाच अवधी राहिला. महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला असून, तो कधी जाहीर करायचा याबाबतचे मार्गदर्शन उद्या, सोमवारी किंवा मंगळवारी पालिका प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे.
आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग निश्चिती आणि आरक्षण याबाबत शहरात कमालीची उत्सुकता आहे. सध्याच्या ७७ प्रभागांतील इच्छुकांच्या नजरा त्यावरच खिळून राहिल्या आहेत. महापालिका प्रशासनाला प्रत्येक दहा वर्षांनी प्रभाग रचना बदलावी लागत असल्याने यावेळी ती बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्याचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. ज्या दिवशी प्रभाग जाहीर केले जाणार आहेत, त्याच दिवशी जाहीर सोडतीद्वारे त्या-त्या प्रभागातील आरक्षणही जाहीर करण्यात येणार आहे. ही तारीख सोमवारी किंवा मंगळवारी कळण्याची शक्यता आहे.
सध्या शहराची लोकसंख्या ५ लाख ४९ हजार २३७ इतकी असून, कमीत कमी ६१००, तर जास्तीत जास्त ७००० लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत. एका प्रभागात सर्वसाधारण साडेपाच ते सहा हजार मतदारांचा समावेश असेल. यंदा प्रथमच महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणार आहे. यावर्षी चार प्रभाग वाढले आहेत. (प्रतिनिधी)
प्रभाग, आरक्षण निश्चित झाल्यावर भूमिका ठरवू : पालकमंत्री
महानगरपालिका निवडणुकीसाठी आधी प्रभाग, आरक्षण निश्चित होऊ देत; मग कोणाबरोबर युती करायची की स्वतंत्र लढायचे ते ठरवू, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निवडणूक प्रक्रियाच सुरू झाली नाही. त्यामुळे अद्याप कोणाशीही चर्चा सुरू नाही. चर्चा करायची झाली तर ती कोणत्या मुद्द्यावर करायची, असा प्रश्नच पालकमंत्र्यांनी विचारला. ताराराणी आघाडीसोबत युती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची चर्चा सुरू असल्याबाबत पालकमंत्र्यांनी खंडन केले. मंत्री म्हणून मला सगळेच भेटत असतात. निवडणूक जवळ येईल, तेव्हा पाहूया, असे ते म्हणाले. शिवसेना-भाजप यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत काही बोलायचे नाही,’ असे सांगून उत्तर देण्याचे टाळले.