कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी या महापालिकांची निवडणूक अखेर चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे मंगळवारी नगर विकास विभागाने राज्यातील ‘ड’ महापालिकेसंबंधी काढलेल्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. नगरविकास विभागाने आगामी निवडणुकीसाठी चार चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणामी यावेळची महापालिका निवडणूक रंगतदार होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीचा मार्ग ६ मे रोजी मोकळा झाला. यामुळे शासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेच्या सदस्य संख्येसंबंधीचा आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तिथे चार सदस्य मात्र तीनपेक्षा कमी नाहीत आणि पाचपेक्षा अधिक असू नये असे म्हटले आहे. सदस्यसंख्या निश्चित झाली तरी प्रभागांची संख्या, सीमा शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने अधिसूचित करण्यात येणार आहे.दरम्यान, महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० मध्ये संपली. त्यानंतर प्रशासकराज सुरू आहे. यापूर्वी तीन वेळा प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया राबविली होती. मात्र, ऐनवेळी निवडणुकीची प्रक्रिया स्थगित झाली. आता सर्वाेच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय पातळीवर निवडणूक तयारीच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे.
- पक्षीय पातळीवर निवडणूक लढवण्यास इच्छुकांची संख्या वाढणार
- अपक्ष निवडणूक लढवून विजयी होण्याचा मार्ग खडतर
- मतदारांची संख्या वाढली तर विविध आमिषाने मतदान वळवणे अवघड.
- महायुतीत उमेदवारांचे दावेदार वाढल्यास बंडाळीचा धोका.
तीन वेळा प्रक्रिया; पण..सभागृहाची मुदत संपल्यानंतर २०२० मध्ये एक सदस्य आणि ८१ प्रभागानुसार पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा २०२१ मध्ये ओबीसी आरक्षण वगळून प्रभागरचना झाली. जुलै २०२२ मध्ये शेवटची तिसरी प्रभागरचना ३० प्रभागांत प्रत्येकी तीन आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे झाली. त्यानंतर आता चार सदस्यीय प्रभागानुसार निवडणूक होणार आहे.
मावळत्या सभागृहातील बलाबल
- काँग्रेस - ३३
- राष्ट्रवादी - ११
- शिवसेना - ४
- ताराराणी आघाडी - १९
- भाजप - १४
- एकूण जागा - ८१
प्रभागरचनेची जबाबदारी आयुक्तांवरचार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर असेल. ही प्रभाग रचना निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करायची आहे. त्यांची मान्यता अंतिम असेल. या प्रभागरचनेवर हरकतींवर सुनावणी जिल्हाधिकारी घेतील. अंतिम प्रभाग रचना महापालिका आयुक्त प्रसिद्ध करतील.
अशी होणार प्रभाग रचनाप्रभाग रचना करताना सर्व प्रथम उत्तर दिशेकडून सुरवात करावी, उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व), त्यानंतर पूर्व दिशेने येऊन पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा, प्रभागांना क्रमांकही त्याच प्रद्धतीने द्यावेत, प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता पाहावी, अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत.