विभागातील २८ हजार वीज ग्राहकांची प्रतीक्षा संपली

By Admin | Updated: August 31, 2015 00:44 IST2015-08-31T00:44:42+5:302015-08-31T00:44:42+5:30

‘महावितरण आपल्या दारी’ : परिमंडळात १८०० नवे रोहित्र उभारणार

The waiting period of the 28 thousand electricity consumers in the division is over | विभागातील २८ हजार वीज ग्राहकांची प्रतीक्षा संपली

विभागातील २८ हजार वीज ग्राहकांची प्रतीक्षा संपली

कोल्हापूर : ओव्हरलोडची समस्या आणि काही तांत्रिक कारणांमुळे नियमांनुसार पैसे भरूनदेखील वीज जोडणीची (कनेक्शन) ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या तीन वर्षांपासून अशा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सुमारे २७ हजार ग्राहकांची आता प्रतीक्षा संपली आहे. संबंधित ग्राहकांना वीज जोडणी लवकरात लवकर देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात १८०० नवीन रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. परिमंडळात सध्या कार्यान्वित असलेल्या रोहित्रांमध्ये ओव्हरलोडची समस्या उद्भवत असल्याने तेथून नवीन वीजजोडणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही.
नियमांनुसार शुल्क भरूनही (पेड पेडिंग) कोल्हापूर जिल्ह्यातील ८ हजार आणि सांगलीतील २० हजार ग्राहक नव्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वीज जोडणी देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात एकूण १८०० नवीन रोहित्र उभारणी आणि एच. टी., एल. टी. लाईन उभारणीचे काम सुरू केले आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचे ‘महावितरण’चे नियोजन आहे.
महावितरणच्या नव्या रोहित्र उभारणीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेतील ग्राहकांची घरे लवकरच विजेच्या प्रकाशामुळे लखलखणार आहेत. (प्रतिनिधी)

पाचशे कोटींचा पायाभूत आराखडा
ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी ‘महावितरण’कडून पाचशे कोटी रुपयांचा पायाभूत आराखडा कोल्हापूर परिमंडळासाठी राबविण्यात येत आहे. त्यात कोल्हापूरसाठी तीनशे आणि सांगलीसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातून कोल्हापूरमध्ये २८ नवीन उपकेंद्रे (सबस्टेशन) आणि सांगलीत ३० उपकेंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्यासह सध्या कार्यरत असलेली उपकेंद्रे, ट्रान्स्फॉर्मरचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. या पायाभूत आराखडा योजना दोन अंतर्गत सध्या नव्या रोहित्र उभारणीचे काम होत आहे.

पैसे मागितल्यास ‘लाचलुचपत’शी बोला
वीज जोडणीची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमांतर्गत रोहित्र, एच. टी., एल.टी.ची लाईन उभारण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. या कामासाठी लागणाऱ्या वाहिन्या उपलब्ध करून देणे. सामानांची वाहतूक करणे अशी सर्व जबाबदारी ठेकेदारांची आहे. यामुळे ग्राहकांनी अनाधिकृतपणे साहित्याची खरेदी, वाहतूक तसेच आर्थिक व्यवहार करू नये. कोणत्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले

Web Title: The waiting period of the 28 thousand electricity consumers in the division is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.