जयसिंगपुरात ‘धर्म बचाव’साठी विराट मोर्चा

By Admin | Updated: August 25, 2015 00:25 IST2015-08-25T00:25:09+5:302015-08-25T00:25:21+5:30

हजारो जैन श्रावक-श्राविका सहभागी : राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन

Viraat Morcha for 'Dharma Rescue' at Jaysingpur | जयसिंगपुरात ‘धर्म बचाव’साठी विराट मोर्चा

जयसिंगपुरात ‘धर्म बचाव’साठी विराट मोर्चा

जयसिंगपूर : सल्लेखना/संथारा व्रतावर निर्बंध घालण्याच्या निर्णयाविरुद्ध जयसिंगपुरात सोमवारी ‘धर्म बचाव आंदोलन’ करण्यात आले. राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्माची तत्त्वे समजून न घेता ‘सल्लेखना’ म्हणजे ‘आत्महत्या’ असा निर्णय दिला आहे. तो शासनाने रद्द करावा, या मागणीप्रश्नी जैन समाजाच्यावतीने शहरातून विराट मूक मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.
शासनाने निर्णय रद्द न केल्यास भविष्यात अहिंसेच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सुमारे एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गिरी यांना देण्यात आले.
सोमवारी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांच्या हस्ते मादनाईक मळा येथून ‘धर्म बचाव आंदोलन’ मोर्चास सुरुवात झाली. ‘जीवन में तप और धर्म का
मूल हैं, आत्महत्या जुर्म हैं, सल्लेखना/संथारा धर्म हैं’ सल्लेखना मरण नही, मोक्ष है, अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चात श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. मोर्चा आठवी गल्ली ते स्टेशन रोड, पहिली गल्ली त्यानंतर गांधी चौक ते तेराव्या गल्लीतून विक्रमसिंह क्रीडांगणावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी आ. उल्हास पाटील म्हणाले, सल्लेखना व्रताबाबत घेतलेला निर्णय जैन धर्मावर अन्यायकारक आहे. न्याय मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे दाद मागणार आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, जैन धर्मावर झालेल्या अन्यायाविरोधात अहिंसेच्या मार्गाने लढायचे आहे. कायद्यातील कलम रद्द व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण सर्वांनी संघटितपणे लढायचे आहे.
जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, अभयकुमार बरगाले, सुरेश चौगुले, अ‍ॅड. आप्पासाहेब पाटील, जैन कासार संघटनेचे अध्यक्ष सुभाष साळवी, आदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर यांनी स्वागत केले. बा. ब्र. तात्याभैया नेजकर प्रास्ताविकात म्हणाले की, याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून निर्णय रद्द करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
रॅलीचे संयोजन आध्यात्मिक पावन वर्षायोग समितीच्यावतीने सागर मादनाईक, राजू नरदे, लोहीकांत खोत, आदिनाथ मादनाईक, प्रेमजित पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले होते. मोर्चात श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी समाजाचे प्रतिनिधी, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक सीमाभागातील हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. सूत्रसंचालन अभयकुमार भिलवडे यांनी केले, तर प्रदीप सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Viraat Morcha for 'Dharma Rescue' at Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.