विठ्ठलाच्या ओढीने गगनबावड्यातील ३०० वारकरी दिंडीत
By Admin | Updated: July 4, 2014 00:53 IST2014-07-04T00:41:19+5:302014-07-04T00:53:11+5:30
आषाढ महिना सुरू झाला की

विठ्ठलाच्या ओढीने गगनबावड्यातील ३०० वारकरी दिंडीत
एम. ए. शिंदे ल्ल साळवण
आषाढ महिना सुरू झाला की, गगनबावड्यातील वारकऱ्यांना लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची आस. वारकरी ऊन, वारा, पाऊस हे सर्व आनंदाने सोसत विठ्ठलाच्या ओढीने दिंडीमध्ये सामील होतात. तालुक्यात साधारणपणे १५०० वारकरी आहेत. आषाढ वारीसाठी ३०० वारकरी मार्गस्थ झाले आहेत.
देवाचीये दारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधीयेल्या।।
या ओवीप्रमाणे पांडुरंगाच्या दारी जाऊन भेट घेतली की, चार प्रकारची मुक्ती मिळते, अशी वारकऱ्यांची धारणा असते. त्यामुळे अवघा प्रपंच पाठीमागे सोडून काही दिवस का असेना दिंडीत सहभागी होऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी धावतात. आज अनेकजण पैशाच्या व सुखाच्या पाठीमागे धावत आहेत आणि खरे आस्मिक सुख हरवून बसले आहेत. वारकऱ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या
सुखासाठी जरी तु करीशी तळमळ ।
तरी तु पंढरीशी जाय एक वेळ।।
या ओळी ऐकल्या की, खऱ्या सुखाची प्रचिती येते. गगनबावडा तालुक्यात वारकरी सांप्रदायाची पहिली पताका फडकविली ती कै. दत्तात्रय मोळे (निवडे) व कै. पांडुरंग बाळू कांबळे (तिसंगी) यांनी.
आज तालुक्यात १५०० वारकरी असून विविध उपक्रम राबविण्यासाठी गगनबावडा तालुका वारकरी सेवा संघ स्थापन केला आहे. दर पक्ष पंधरावड्याच्या एकादशीला प्रत्येक गावात प्रवचनाचे आयोजन करतात. विठ्ठल मंदिर बांधलेल्या गावातून वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सामुदायिक पारायण, कीर्तन, प्रवचन, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सेवा संघाचे अध्यक्ष सखाराम दत्तू पाटील (असंडोली) व सचिव मधुकर श्रीपती पाटील (तिसंगी) यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संघाची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.
पांडुरंगाच्या साक्षीने जीवन आनंददायी जगावे, सुख समाधान मिळावे ही प्रत्येक वारकऱ्याची मनोकामना असते.
याजंसाठी केला होता अट्टाहास।
शेवटचा दिवस गोड व्हावा।।