विक्रमसिंहराजेंचे विचार आयुष्यभर साथ देतील

By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-27T23:57:40+5:302015-05-28T00:58:45+5:30

समरजितसिंह घाटगे : कार्यक र्त्यांशी साधला संवाद

Vikrama will get the thoughts of contemplation back to life all the time | विक्रमसिंहराजेंचे विचार आयुष्यभर साथ देतील

विक्रमसिंहराजेंचे विचार आयुष्यभर साथ देतील

कागल : राजेसाहेबांच्या आकस्मिक निधनाने आमच्या कुटुंबीयांबरोबरच आपल्या सर्वांवर ‘आभाळ’ कोसळले. मी तर फार खचून गेलो होतो. दिवसभर माझ्यासमोर अंध:कार दाटला होता. अंत्यसंस्कार करून घरी परत आलो तेव्हा समजले की शाहू साखर कारखान्याचे कामगार विक्रमसिंहराजेंचा ‘शब्द’ पाळण्यासाठी याही परिस्थितीत कारखान्याचे काम बंद न करता अश्रू ढाळीत काम करीत आहेत. या घटनेने मला आत्मविश्वास मिळवून दिला की राजेसाहेब शरीररूपाने नसतील पण त्यांचे विचार मला आयुष्यभर साथ देतील, अशा शब्दांत नूतन अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
निमित्त होते कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पातील बायोगॅस प्रकल्पाच्या उद्घाटनाचे. नूतन अध्यक्ष म्हणून कारखान्याचा पहिलाच कार्यक्रम असल्याने समरजितसिंहां- बरोबर त्यांचे चुलते श्रीमंत प्रविणसिंहराजे, भाऊ विरेंद्रसिंहही हजर होते.
घाटगे म्हणाले, मी आज तुमच्याशी जाहीर संवाद साधायचा तर काय बोलायचे, हा विचार करण्यासाठी घरात राजेसाहेबांच्याच खोलीत काही काळ जाऊन बसलो. राजेंच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. पण त्यांच्या विचारधारेंची पोकळी निर्माण होणार नाही. याची काळजी आपण घेऊया. त्यांच्या धोरणांची जपणूक करूया. बांधिलकी म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून शाहू आघाडीची जबाबदारी मी घेतलेली आहे. राजकारणात हे आपले वेगळे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवू. यावेळी आ. वीरकुमार पाटील, अमरसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)


पवार आणि कागलचे राजकीय विद्यापीठ
आमदार वीरकुमार पाटील म्हणाले की, यापुढे ‘राजेगट’ म्हणून आमचा गट कार्यरत राहील. त्यांचे नेतृत्व समरजितसिंहराजे करतील. सीमाभागातील जनता तुमच्या पाठीशी कायम आहे. कागल तालुक्यात मात्र, जरा जपून पाऊल टाका, कारण एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात जर कोठे राजकीय विद्यापीठ स्थापन करायचे असेल तर ते मी कागललाच करेन.
आठवड्यातील चार दिवस कागलमध्ये....
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, यापूर्वी माझा संपर्क कमी पडला असेल पण आता मी संपर्क वाढविणार आहे. आठवड्यातील चार दिवस शाहू साखर कारखाना आणि दूध संघावर थांबणार आहे. दोन दिवस कोल्हापुरात असेन. कोणीही कोठेही भेटा. पिढी बदलली आहे. चेहरा बदलला आहे पण राजेंच्या विचारांचे धोरण कायम आहे. माझे चुकले असे वाटले तर माझे चुलते प्रविणसिंहराजेंना सांगा, ते माझा कान पकडतील.

Web Title: Vikrama will get the thoughts of contemplation back to life all the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.