वेळुकर यांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली
By Admin | Updated: February 19, 2015 23:46 IST2015-02-19T22:35:41+5:302015-02-19T23:46:04+5:30
भालचंद्र मुणगेकर : कुडाळ येथील सत्कार समारंभात व्यक्त केली खंत

वेळुकर यांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली
कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी असलेल्या डॉ. राजन वेळुकर यांची नियुक्ती ही निवड झाल्यापासूनच वादग्रस्त ठरली असल्याने वेळुकरांनी यापूर्वीच राजीनामा देणे आवश्यक होते. मात्र, त्यांना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागेपर्यंत त्या पदावर थांबलेल्या डॉ. राजन वेळुकरांनी कुलगुरू पदाची प्रतिष्ठा निश्चितपणे कमी केली असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुडाळ येथील गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच कुलगुरू निवड करणाऱ्या कमिटीने यापुढे जबाबदारीने काम करावे, असा सल्लाही निवड समितीला दिला.
वादग्रस्त ठरलेल्या मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना राज्यपालांनी कुलगुरू पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, डॉ. राजन वेळुकरांची या पदी निवड होण्याअगोदर मे २००० ते २००४ या कालावधीत या विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो. मात्र, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माझी निवड देशाच्या योजना सदस्य आयोगावर केल्याने मला या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मी गेल्यानंतर या पदावर डॉ. राजन वेळुकरांची निवड कुलगुरू पदावर केली. मात्र, त्यांच्या या निवडीनंतर दहा वर्षांच्या कालावधीत अनेक घटना मुंबई विद्यापीठात घडल्या. त्यातील जास्तीत जास्त घटना वादग्रस्त होत्या. त्यांची निवड झाल्यापासून डॉ. वेळुकर यांची या पदी निवड हीच वादग्रस्त ठरली होती, असा खुलासाही यावेळी खासदार मुणगेकर यांनी
केला. (प्रतिनिधी)
निवड समितीवर ताशेरेच : भालचंद्र मुणगेकर
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती कुलपतीने ज्याअर्थी रद्द केली, ते पाहता एका अर्थाने निवड समितीच्या कार्यपद्धतीवर कुलपतींनी ओढलेले ताशेरेच आहेत, असे मत खासदार मुणगेकर यांनी व्यक्त केले. एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू होणे अशी शिक्षण क्षेत्रातील व्यक्त ींची इच्छा असल्यास त्यात काही गैर नाही. परंतु विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची प्रतिष्ठा समाजातील स्थान लक्षात घेता आपण कुलगुरू व्हावे, इतकीच इच्छा कमी नाही, तर आपण या पदासाठी लायक आहोत का, याचा सुध्दा विचार प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होऊन करणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार मुणगेकर यांनी व्यक्त केले.
निवड समितीने जबाबदारीने वागावे
डॉ. वेळुकरांच्या नियुक्तीवरून ज्या प्रकारची वादग्रस्त परिस्थिती उद्भवली, ती लक्षात घेता यापुढे फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर कुलगुरूंची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने यापुढे अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे.