सोयाबीनची उगवण क्षमता तपासून घरगुती बियाणे वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:09+5:302021-05-01T04:23:09+5:30
कोल्हापूर : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता ...

सोयाबीनची उगवण क्षमता तपासून घरगुती बियाणे वापरा
कोल्हापूर : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरात येते. त्यामुळे उगवण क्षमता तपासून शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून वापरता येते. ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.
प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.
चौकट ०१
ही घ्या दक्षता
सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी ७ फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी.
चौकट ०२
जिल्ह्यात सोयाबीनची १३ हजार ६७६ क्विंटलची मागणी नाेंदविण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत महाबीजचे २ हजार ९५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. गेल्यावर्षी बियाण्याचा दर ६९ रुपये प्रतिकिलो असा होता. यावर्षी बियाण्याची टंचाई असल्याने या किमती किमान १०० रुपयांनी तरी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाळी सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ७ हजारांवर गेल्याने शेतकऱ्यांनी विकून टाकला आहे. त्यामुळे बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे.