सरकारबद्दल जनतेत अस्वस्थता
By Admin | Updated: April 10, 2016 01:13 IST2016-04-10T01:13:06+5:302016-04-10T01:13:06+5:30
उद्धव ठाकरे : सरकारला घरचा आहेर; सदाशिवराव मंडलिक पुतळा अनावरण

सरकारबद्दल जनतेत अस्वस्थता
कोल्हापूर : दुष्काळ, शेतकरी आत्महत्या यांसह जनसामान्यांशी निगडित विविध प्रश्नांवर वृत्तपत्र व जाहीर सभा यांमधून आमच्या भावना मांडतो, ती आमची आदळआपट नसून जनतेच्या भावना असतात. पंधरा वर्षांची राजवट फेकून देत ज्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली, त्यांच्या मनात सरकारबद्दल अस्वस्थता आहे. याबाबत आपण दक्ष राहिलो नाही तर आपणही नालायक ठरू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.
हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक पूर्णाकृती पुतळा अनावरण, प्रेरणा स्थळ उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्याचे कौतुक करीत उद्धव ठाकरे म्हणाले, सदाशिवराव हे बंडखोर व्यक्तिमत्त्व होते. यशवंतराव चव्हाण यांनी कॉँग्रेस सोडल्यानंतर त्यांनाही सुनावण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. इच्छाशक्तीच्या जोरावर एकटा माणूस दूधगंगेचे पाणी वेदगंगेत आणून परिसराचे नंदनवन करू शकतो, तर आपण सर्वजण एकत्र येऊन दुष्काळावर काम का करू शकत नाही. चंद्रकांतदादा आमच्या भावना या आदळाआपट नाहीत, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सरकार ज्यांनी फेकून दिले, त्या जनतेच्या भावना आहेत. त्यांची आठवण ठेवून आपण काम केले नाही तर आपणही नालायक आहोत, असेच म्हणावे लागेल. शेतकरी सरकारकडे भीक मागत नाहीत, त्यांच्या कष्टाचे पैसे मागतात. निसर्ग कोपतो त्यावेळी सरकारकडून अपेक्षा असतात. दुष्काळाच्या काळात राजर्षी शाहू यांनी घोड्यावरून खेडोपाडी फिरून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न केले होते. त्या शाहूंची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात आम्ही सगळे एकत्र येऊन काम का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. सदाशिवराव मंडलिक यांनी ज्या विश्वासाने संजय मंडलिक यांना आपल्याकडे सुपूर्त केले, त्यांचा विश्वासघात करणार नाही, त्यांची संपूर्ण जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूरचा टोल प्रश्न, अपात्र कर्जमाफी व पासपोर्ट कार्यालय सुरू करणे यासाठी सदाशिवराव मंडलिक यांनी शेवटपर्यंत लढा दिल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातून फुललेल्या नेतृत्वाने नेहमीच सामान्य माणसांचे हित जोपासले, अशी माणसे विरळच असतात की, ज्यांची आठवण सर्वच स्तरांतील लोकांना येते. मंडलिक यांनी साखर कारखानदारीबरोबर शेतकरी जगला पाहिजे हे तत्त्व जोपासले, त्याच तत्त्वाने सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यातील दुष्काळावर मात केली असून, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करून सरकारच्या चुका दाखविल्या. त्यांच्या सूचनांना सरकारमध्ये मानाचे स्थान आहे.
सदाशिवराव मंडलिक यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सदाशिवराव यांनी तडफेने नेतृत्व केले. त्यांनी शेवटपर्यंत पुरोगामी विचारांचा वारसा कधी सोडला नाही; पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सहयोगी सदस्य असूनही त्यांना उमेदवारी देता आली नसल्याने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीपुरते राजकारण करावे. चोवीस तास द्वेष, मत्सर नको, उद्धवजी व दादा राज्यात फार वाईट परिस्थिती आहे. मदत व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळाला तोंड देत जागेवर निर्णय घेतले. तुम्ही ते करण्याची गरज असून, हा दुष्काळ गांभीर्याने घेऊन याबाबत ठोस आराखडा तयार करा.
मंडलिक यांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केल्याचे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, स्पष्ट वक्ता व सामान्य माणसाबद्दल संघर्ष करणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा होती. आपला विचार शेवटपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले, तर ती खरी मंडलिक यांना श्रद्धांजली ठरेल.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, मंडलिक द्रष्टे नेते होते, चळवळीच्या मुशीतून तयार झाल्याने त्यांना त्याची जाण होती. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना अंतर दिले नाही.
अमृतमहोत्सवाप्रमाणे सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला, ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, असा खुलासा करीत मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक म्हणाले, स्वर्गीय मंडलिकसाहेबांच्या विचारांच्या शिदोरीवर आमची वाटचाल सुरू असून, आगामी काळात जिल्ह्यातील सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच काम करू. धामणी व नागणवाडी प्रकल्पांचे काम पूर्ण करून तेथील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवावे, अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरे व चंद्रकांतदादा पाटील यांना केली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिल्पकार किशोर पुरेकर, आर्किटेक्ट गजेंद्र साबळे यांचा व वाढदिवसानिमित्त संजय मंडलिक यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर अश्विनी रामाणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास