मानधन दोनशे रुपये.... प्रतिष्ठेसाठी लाखोंची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:39+5:302021-01-08T05:19:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : लाखो रुपयांची उधळपट्टी करून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमाह मिळतात अवघे ...

मानधन दोनशे रुपये.... प्रतिष्ठेसाठी लाखोंची उधळपट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : लाखो रुपयांची उधळपट्टी करून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमाह मिळतात अवघे दोनशे रुपये, तरीसुध्दा सदस्य होण्यासाठी चढाओढ काही कमी नाही. केवळ प्रतिष्ठा आणि राजकीय ताकद आजमविण्यासाठी लढवल्या जाणाऱ्या निवडणुकीत विकास कामाचा मुद्दा प्रचारासाठीचे तोडसुख असते. त्यामुळे गावभागातील विकासाचे मुद्दे वर्षानुवर्ष तसेच कायम राहिले आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा ‘श्री गणेशा’ करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल, याचा काही नेम नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेसाठी की विकासकामांसाठी? असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून पुढे येत आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावात आणि गटाची ताकद दाखविणाऱ्या असतात. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांचे या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष असते. अलीकडच्या निवडणुकीत बऱ्यापैकी पैसेवाल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते. वारेमाप खर्चामुळे निवडणूक म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला धडकी भरते. त्यामुळे गटाला उमेदवार मिळविताना गटनेत्यांचा कस लागतो. गावाभागात विभागलेल्या पाचशे हजारांच्या प्रभागात लाखोंची उधळपट्टी करावी लागते.
गावच्या विकासाचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असली की, गटनेत्यांचे राजकारणाबरोबर अर्थकरण साधते. त्यासाठी गटनेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. ग्रामपंचायतीच्या सदस्याने दरमहा हजेरी लाव,ली तर दोनशे रुपये
मानधन मिळते. वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने निधी मिळाला, तर गावातील प्रभागाचा विकास, अन्यथा सारा गाव भकास. सरकारी योजनांचा कारभार गटनेत्यांच्या मर्जीतील सदस्याला मिळतात. यासाठी चढाओढ सुरूच असते. यातूनच सदस्यांमध्ये पाच वर्ष कुरबुरी, नाराजी वाढते. त्याचा फटका निवडणुकीत मोजावा लागतो. अनेक सदस्य मासिक सभेची उपस्थिती सोडाच, गावसभेत बोलताना दचकतात. सदस्य म्हणून निवडून आलेला कार्यकर्ता गावात ‘पुढारी’ म्हणून मिरविण्यापुरता उरतो. सत्तेत सहभागी नसणाऱ्या सदस्याची अवस्था म्हणजे ‘असून घोटाळा, नसून खोळंबा’ अशीच असते. म्हणून ती मिळविण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याची प्रवृत्ती अलीकडच्या निवडणुकीत बळावत आहे.
गावातील सत्ता जरूर मिळवा; परंतु ती मिळविण्यासाठी जेवढी ताकद लावता त्याच्या निम्मी ताकद जर आपल्या प्रभागातील प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी लावली, तर प्रभागाचा विकास होईलच शिवाय निवडणुकीत होणाऱ्या वारेमाप खर्चाला लगाम बसेल. दोनशे रुपयाच्या मानधनासाठी की स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या उमेदवारांपुढे समाजसेवा करून निवडणूक लढविणारा सामान्य कार्यकर्ता आर्थिक कोंडमाऱ्यामुळे हताश होऊन प्रचार करीत आहे.