डिजिटल बँकिंगकडे वळा, कोरोनाला टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:28+5:302021-05-07T04:26:28+5:30
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, रिझर्व बँक, इंडियन बँक असोसिएशन यांनी राज्यातील सर्व खासगी, सहकारी व ...

डिजिटल बँकिंगकडे वळा, कोरोनाला टाळा
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, रिझर्व बँक, इंडियन बँक असोसिएशन यांनी राज्यातील सर्व खासगी, सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या वेळेतही बदल करून, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच फक्त निवडक सेवांसाठी परवानगी दिली आहे. ग्राहकांनी बँक शाखेत न जाता घरूनच डिजिटल बँकिंगचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियातर्फे विपणन अधिकारी अमोल वाघ यांनी केले आहे.
निवड सेवांमध्ये रक्कम जमा करणे, काढणे, धनादेश जमा करणे, फंड ट्रान्स्फर आणि सरकारी व्यवहार आदींसाठी परवानगी दिली आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी ग्राहकांनी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, घरपोहोच बँकिंग सुविधा, एटीएम, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि बँक मित्र सुविधांचा लाभ घ्यावा. याच माध्यमातून ग्राहकांना रोकड जमा करणे, काढणे असे फंड ट्रान्स्फर करणे शक्य आहे. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंगचा लाभ मोबाईल फोनद्वारे घेता येऊ शकतो.
जिल्ह्यात सुमारे १०० पेक्षा जास्त एटीएम आणि ३०० पेक्षा जास्त बँक मित्र कार्यरत आहेत. या माध्यमांचा वापर केल्यास, एकमेकांशी संपर्क न येऊन कोरोना विषाणू संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल. जरुरी काम असेल तरच ग्राहकांनी प्रत्यक्षात बँकेमध्ये यावे. अन्यथा परिस्थिती सुधारेपर्यंत बँकांच्या पर्यायी सुविधांचा वापर करावा, असेही आवाहन बँकेने केले आहे.