आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करा
By Admin | Updated: January 2, 2015 00:16 IST2015-01-01T23:40:57+5:302015-01-02T00:16:52+5:30
विद्या ठाकूर : जयसिंगपूरमध्ये भाजपचा जिल्हा महिला मेळावा उत्साहात

आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करा
जयसिंगपूर : पालकांनी मुलांना शिक्षण व घरातील संस्कार देऊन आदर्श नागरिक बनविण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विकास योजना राबविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा व महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी केले.
येथील दि मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात भाजप मंडलाच्यावतीने जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस बाबा देसाई, धोंडिराम जावळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शुभदा जोशी, उपाध्यक्षा शैलजा पाटील, जिल्हा परिशद सदस्या विजया पाटील, रेश्मा सनदी, रामभाऊ चव्हाण, पुंडलिक जाधव, शंकर बिराजदार यांची उपस्थिती होती.
ठाकूर म्हणाल्या, मतदारांच्या पाठबळामुळेच देशात व राज्यात भाजपकडे एकहाती सूत्रे आली आहेत. महिला व बालविकास योजना राबविण्यासाठी महिलांसाठी प्रबोधन कार्यशाळा घेणे आवश्यक आहे.
यावेळी आमदार हाळवणकर म्हणाले, येत्या स्थानिक स्वराज संस्था व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपची ताकद वाढणार आहे. जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंगाडे व महादेवी मुडशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रागिणी शर्मा यांनी स्वागत केले. जयसिंगपूर मंडलचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास मोहनराव कुलकर्णी, राजेंद्र दार्इंगडे, मिलिंद भिडे, महावीर तकडे, राजेंद्र देशमुख, सायली कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, विनोद कनकानी, शैलेश गाडे, पोपट पुजारी, सुनील शर्मा, आण्णासाहेब पवार उपस्थित होते. रमेश यळगुडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)