आटपाडी-पाचमैल राज्य मार्ग रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:12+5:302020-12-05T04:55:12+5:30
रमेश सुतार : बुबनाळ सांगली जिल्ह्यातील आटपाडी सलगर ते कर्नाटक राज्याच्या हेरवाड पाचमैल या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम ...

आटपाडी-पाचमैल राज्य मार्ग रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल
रमेश सुतार : बुबनाळ
सांगली जिल्ह्यातील आटपाडी सलगर ते कर्नाटक राज्याच्या हेरवाड पाचमैल या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शेकडो झाडांची तोड केली आहे. रस्ता रुंदीकरण करताना शाहू महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी लावलेली झाडे तोडल्याने विकासासाठी पर्यावरणाची हानी होत आहे.
नैसर्गिक पर्यावरणाच्या समतोलामुळे मानवी जीवन टिकून आहे. याच झाडांतून फळे, निवाऱ्याबरोबर ऑ़क्सिजन ही अत्यावश्यक गरज भागविली जाते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी सलगर ते कोल्हापूरमधील हेरवाड पाचमैलपर्यंत १३० कि.मी. मार्गावर छत्रपती शाहू महाराजांनी विविध प्रकारची झाडे लावली होती. नृसिंहवाडीकडे येणारे भाविक अथवा प्रवासी या झाडांच्या सावलीखाली बसून भाकरं खाऊन विश्रांती घेऊनच पुढील प्रवासाला जात.
मात्र, बदलत्या एकविसाव्या युगात दळणवळणाची साधने वाढल्याने रस्ते अपुरे पडू लागले. त्यामुळे वारंवार अपघात होऊ लागले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आटपाडी-हेरवाड पाचमैल हा राज्य मार्ग क्रमांक १५३ रुंदीकरणाचे ठरविले आहे. चारशे कोटी रुपयांची तरतूद असलेला हा रस्ता अकरा मीटर होणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणाबरोबर रस्त्यालगत असणारी शेकडो झाडांची तोड करण्यात येत आहे. यामुळे शाहूकालीन शेकडो वर्षांचा इतिहास जमीनदोस्त होत असल्याने पर्यावरणप्रेमींना धक्का बसला आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची तोड करून त्या मोबदल्यात नवीन झाडे लवकरात लवकर लावावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक हेमंत बाहुलेकर यांनी केली आहे. या नव्या रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. मात्र, पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भरून निघणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फोटो - ०३१२२०२०-जेएवाय-०६
फोटो ओळ - आटपाडी सलगर-हेरवाड पाचमैल राज्य मार्गावर झाडांची तोड सुरू आहे.