‘राजे संभाजी’ची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा
By Admin | Updated: September 5, 2016 00:27 IST2016-09-05T00:27:19+5:302016-09-05T00:27:19+5:30
२७ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली : काहिलीत विसर्जन करून रंकाळा संवर्धनाचे पाऊल

‘राजे संभाजी’ची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा
कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्ताने समाजाचे ऋण फेडत विधायक कामातून आदर्श निर्माण करण्याची परंपरा कोल्हापुरात आहे. राज्याला आदर्शवत ठरलेल्या गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा गेल्या २७ वर्षांपासून शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळाने जोपासली आहे. काहिलीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची मुहूर्तमेढ या मंडळाने कोल्हापुरात रोवली आहे.
कोल्हापूरचे वैभव रंकाळ्याचे संवर्धन करण्यासह पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी १९८९ मध्ये श्री राजे संभाजी तरुण मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनाचा उपक्रम सुरू केला. मंडळाने काहिली ठेवून कोल्हापूरकरांना गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन केले. प्रारंभी या उपक्रमाला काहीजणांनी विरोध केला; पण, पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्य सुरूच ठेवले. त्याला वर्षागणिक प्रतिसाद वाढू लागला. त्यातून काहिलीतील गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा निर्माण झाली. कोल्हापूरकरांनी या उपक्रमात सहभागी होत सात हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. सुनील हराळे, विकास जाधव, शरद तांबट, गुरू चौगुले, अमित मरळकर, अनिल उगळे, सतीश कुसुंबे, संतोष चव्हाण हे कार्यकर्ते ही मंडळाची ताकद आहे.
शाडूच्या मूर्तींसाठी प्रबोधन
निर्माल्यासह प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनाचे प्रमाण वाढल्याने रंकाळ्याचे प्रदूषण वाढले. राजे संभाजी तरुण मंडळाने तत्कालीन अध्यक्ष दिलीप कदम यांच्या नेतृत्वाखाली काहिलीत गणेशमूर्ती विसर्जन सुरू केले. २७ वर्षांपासून हा उपक्रम अखंड सुरू असून, त्याला पाठबळ दिल्याने त्याची व्याप्ती वाढल्याचे माजी अध्यक्ष
अॅड. अजित चव्हाण यांनी सांगितले.
विविध विधायक उपक्रम
खाशाबा जाधव यांच्या पत्नीचा सन्मान, जटा निर्मूलन, गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणाला मदत, प्लास्टिक हटाव, असे उपक्रम राबविले. या मंडळाने सामाजिक देखाव्यातून काम सुरूच ठेवले. रंकाळा संवर्धन कृती समितीची स्थापनाही केली. वसुंधरा सन्मानासह विविध पुरस्कार मंडळाला मिळाल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय आंग्रे यांनी सांगितले.
राज्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं विसर्जनाचा उपक्रम आमच्या मंडळाने राबविला. जलप्रदूषण टाळण्यासाठी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन, शाडूच्या मूर्ती वापरण्यासाठी मंडळ प्रबोधन करणार आहे.
- अजित चव्हाण, माजी अध्यक्ष
मंडळाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाचे राज्यातील संस्थांनी अनुकरण केले. हा उपक्रम राज्यात राबविला जात असल्याचे समाधान आहे. मंडळातर्फे विविध विधायक उपक्रम राबविले जात आहेत.
- संजय आंग्रे, अध्यक्ष